*ऋतू पावसाळा - आगमन*
वर्षभरात एकूण सहा ऋतू येतात. माघापासून ते फाल्गुनपर्यंत अनुक्रमे शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत असा ऋतुबदल घडताना दिसतो. शिशिरादी तीन ऋतूंनी दक्षिणायन तयार होते तर वर्षादी तीन ऋतूंनी उत्तरायण तयार होते. दक्षिणायन मध्ये सूर्याची शक्ती अधिक असते तर उत्तरायण मध्ये चंद्राचे अधिपत्य असून चंद्र बलवान असतो, गार वारा व पाऊस ह्यांच्या योगाने पृथ्वीतील उष्णता कमी होते. दाक्षिणायनाची सुरुवात असल्याने मनुष्याचे बळ जे वर्षां ऋतूमध्ये कमी असते ते दिवसेंदिवस वाढू लागते. तसंच निसर्ग हि बहरू लागतो. पावसाळ्यातलं वातावरण हे गार व रुक्ष झालेले असल्याने निसर्गात आणि शरीरात वातदोषाचा प्रकोप नैसर्गिक रित्या पाहायला मिळतो.
*वात - एक नवी ओळख*
निसर्ग म्हणजेच सृष्टीतली एक जागृत शक्ती. जीवनाची आसक्ती धरत अनेक जीवजंतू जन्माला येतात तसेच लोपही पावतात. उत्पत्ती स्तिथी विनाश हा क्रम न चुकणारा आहे. हे सारे घडवून यायला शक्तीच कारणीभूत ठरते. "अव्यक्तच व्यक्त कर्म" असे विधान आयुर्वेदात वाताच्या संदर्भात मिळते. ज्याचे रूप अव्यक्त, पण कर्माने व्यक्त होते तो म्हणजे वात अर्थात वायू. शरीरपोषणासाठी आहार घेणे, त्याचे पचन करणे, रसरक्तादी धातूंत रूपांतर करणे, मलमूत्रनिर्मिती आणि त्यांचे शरीराबाहेर विसर्जन, श्वासोच्छवासादी क्रिया करणे, बोलणे , चालणे, सर्व इंद्रियांनी आपापले विषय ग्रहण करणे , मनाचे व बुद्धीचे व्यापार घडणे, शरीर धातू परमाणूंची उत्पत्ती व नाश नियमितपणे करणे, इत्यादी असंख्य व भिन्न पद्धतीचे व्यापार शरीरामध्ये चालत असतात. जसं वीज हा पदार्थ आपल्याला दिसू शकत नाही परंतु विद्युतशक्तीमुळे सर्वत्र प्रकाश उज्वलीत केला जातो, तसंच वाताचे रूप अव्यक्त पण कर्माने तो व्यक्त होतो.
रुक्ष:, लघु:, शीत: , खर: , सूक्ष्म: , चल: हे वाताचे गुण आहेत. (रूक्ष म्हणजेच शोषण करणे किंवा वियोग करणे, लघु म्हणजे हलकेपणा निर्माण करणे, शीत : म्हणजे स्तंभन करणे, खर म्हणजे खरखरीतपणा किंवा खरवडणे, सूक्ष्म म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म स्रोतसांमध्ये कार्य करता येते, चल म्हणजे गतिमान असणे. ) आता बघा ना, वात म्हटलं तर लोकांना फक्त पोटात होणारा गॅस आणि सांध्यांच्या ठिकाणी वात एवढाच काय तो परिचय. तर हे दोन्ही वात विकारात्मक म्हणायचे का ? तर नाही ! वात जर ह्या दोन्ही ठिकाणी सुस्थितीत असेल तरच देहाची प्राकृत अवस्था टिकून राहते. ज्यावेळेस या वाताच्या गतीला अडथळा निर्माण होतो त्यावेळी परिस्थिती विकृती कडे वळायला लागते आणि मग आजारपण जन्माला येऊ लागतात. "पिंडी ते ब्रह्मांडी" म्हणतात तसंच निसर्गात असलेला वात हा मनुष्य शरीरात ही आहे. शरीरातल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाला त्यांच्या कार्यसिद्धीला नेणारा हा वातच असतो आणि निसर्गामध्ये ऋतू बदल घडवून आणणारा देखील वातच.
पित्तं पंगू कफं पंगु पंगवो मलधातव: |
वायुनां यत्र नियन्ते तत्र गच्छंती मेघवत | |
ज्याप्रमाणे आकाशातील ढगांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वायू हलवतो त्याच ठिकाणी वर्षा होते त्याच प्रमाणे हा वायु शरीरात निष्क्रिय असलेले पित्त-कफ-मल-धातु आदींना क्रिया किंवा हालचाल करायला भाग पाडतो. शरीरात किंवा निसर्गात राहणारी सर्वोच्च सामर्थ्यवान शक्ती हीच होय. भूतलावरच्या जलाशयाला कोरडं करण्याचं, भूगर्भातल्या तापलेल्या लाव्हारस बाहेर फेकण्याचं, जमिनीतले अंकुर बाहेर काढणं, त्याला वाढवणं हे जसं वाताचं कार्य त्याच प्रकारे शरीरातल्या पेशींची वाढ करणे, त्यांचा विनाश करणे हे देखील वाताच्या क्षेत्रातील कामगिरी आहे. वाताला आयुर्वेदामध्ये सर्व क्रियांचा प्रणेता, सर्व क्रियांचा उद्योजक म्हटलेलं आहे. अशी ही सृष्टी आणि मनुष्य देह हे सर्वत्र ह्या वाताने व्यापलेला असून सर्व क्रिया ह्या त्याच्या अधिपत्याखालीच घडतात. तसेच या वर्षाऋतु मध्ये वात प्रकोपाचा काळ सांगितलेला आहे.
*ट्रेकिंग आणि वात*
ट्रेक म्हणजे थोडक्यात भटकंती, मग ती गड माथ्यावर असो किंवा रानावनात, ज्या मध्ये गिर्यारोहण किंवा पदभ्रमंती हा प्रकार करावा लागतो. हि क्रिया करताना शारीरिक व मानसिक व्यायाम घडत असतो ज्या मध्ये शरीरामधले विविध अंगप्रत्यंग सक्रियतेने सहभागी असतात. कंबर (कटी ) आणि त्या खाली असलेल्या मांड्या (सक्थि) ,गुडघे (अस्थी - संधी ), पाय, तळवे ह्या ठिकाणी असलेल्या हाडांचा उपयोग चढताना करावा लागतो. गार वारा असेल तर शरीरावरील आवरण स्वरूपी असलेली त्वचा (स्पर्शनेंद्रियं) हि ओली होऊन शरीरात गारठा वाढविण्याचं काम करते. जोरात वाहणारा वेगवान वारा हा कानांमध्ये (श्रोत्र ) जाऊन डोकं धरणे, थंडी वाजणे, कान दुखणे ह्या सारखी दुखणी निर्माण करू शकतो. ह्या मधले सगळेच अवयव हे वाताचे प्रमुख स्थान म्हणून सांगितले आहेत.
पक्वाशय कटी सक्थि श्रोत्र अस्थी स्पर्शनेंद्रियं ।
स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः ।।
हि वाताचे प्रमुख स्थाने आयुर्वेदाने सांगितली आहेत.
ट्रेकिंग म्हटलं की पावसाळ्यात एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये पहायला मिळतो. पॅशन म्हणून फिरणारे भटके कमी, फॅशन साठी मिरवणाऱ्या लोकांच्या संख्येत भर पडली आहे . फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वर फोटोंसकट झळकणाऱ्या मंडळांची वाढ झपाट्याने दिसू लागली आहे. कौशल्याचा पुरेपूर अभ्यास नसताना केलेली भटकंती, पुरेपूर अनुभव नसल्याने केलेली भटकंती आदी कारणांनी हा खेळ जीवावर बेतू शकतो .
ट्रेकिंग साठी निरनिराळ्या ठिकाणी मित्रांसोबत, ग्रुप सोबत तर काही परिवारासोबत जाताना दिसतात. बहरलेला निसर्ग, हिरवेगार झालेल्या कातळ, धुकं दाटलेल्या दऱ्याखोऱ्या, उंचच उंच कोसळणारे धबधबे हे सारं काही मन सुखावणारे आहे. "अनुकूल वेदनियं सुखं" म्हणजे मनाला अनुकूलतेची जाण देऊन जाते ते सुख आणि हेच सुख अनुभवायला भटक्यांचे खेळ या पावसात सुरू होतो.
त्यामुळेच काही खालील बाबींवर लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
*पावसाळा ट्रेक व विशेष काळजी*
*विशेष सावधानगिरी*
१. गिर्यारोहण करताना आपण जात असलेल्या स्थळाची निवड विचारपूर्वक करून त्या पाठी मागचे उद्देश हे ठरवलेले असावे.
२. ज्या गडावर जायचे ठरते त्याचा ऐतिहासिक व भौगोलिक दृष्ट्या अभ्यास, त्याच्या नजीकच्या गावांची नावं , पायथ्याच्या गावाचं नाव, जाणारे मार्ग, गूगल नकाशा, वाहतूक पद्धती आणि वेळापत्रक या सगळ्या गोष्टी हाताशी बाळगाव्या.
३. पावसाळ्यात जतन तिथल्या पावसाचा अंदाज घेऊन काही रस्त्यात अडथळे निर्माण झालेत का किंवा काही धोक्याचे चिंन्ह आहेत का हि माहिती काही संबंधित स्थानिक लोकांशी बोलून प्राप्त करून घ्यावी.
४. गडावर जाताना सोबत अनुभवी व्यक्ती आणि योग्य माहिती असणे अत्यावश्यक अथवा गावातून एखादा जाणकार व्यक्ती गाईड म्हणून सोबत घ्यावा.
५. गडावर फिरताना निरीक्षणाच्या गोष्टी - गाडाची रचना आणि वैशिष्ट्य, वन-वन्य जीवन, विविध फुले, किटक, सभोवतालच्या परिसरातील डोंगररांग इ.
६. ट्रेक ला कोणत्याही पद्धतीचा निष्काळजीपणा व अति साहस करू नये.
७. आपण ज्या ट्रेक ग्रुप सोबत जात आहोत त्याची खरीखुरी माहिती आणि त्यांचे दूरध्वनी क्रंमांक आपत्कालीन संपर्कासाठी आपल्या घरी देऊन ठेवावे.
*आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी*
१. गडभेटला जाण्यापूर्वी आपला स्वास्थ्य तपासणी करून घेणे अथवा आपल्या फॅमिली डॉक्टरांकडुन फिटनेस जाणून घेणे अत्यावश्यक.
२. दमा , अॅलर्जी, ब्लड प्रेशर सारखे आजार असल्यास त्याची कल्पना आपण जात असलेल्या ट्रेक ग्रुप च्या ट्रेक लीडर ला देणे अत्यावश्यक आहे.
३. ट्रेक ला जात असताना आपला वैयक्तिक प्रथोमोपचार किट आणि स्वतःला लागणारी औषधें सोबत ठेवावी.
३. पावसाळ्यात ट्रेक करताना शरीरामध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि हळू हळू हा शरीरामधल्या हाडांना कमकुवत करून सांध्यांच्या ठिकाणी वेदना उत्पन्न करून काही वर्षांनी ट्रेक मध्ये अडथळे निश्चित आणू शकतो. दूरदृष्टीने हे टाळण्याकरिता वातावरचे उपक्रम म्हणजे तेलाने सर्वांगाला स्नेहन, उष्ण स्वेद, तेलाचा अभ्यंग, तेलाचा बस्ती (एनिमा) , आभ्यंतर स्नेहपान हे वैद्यकीय सल्ल्याने केल्यास ह्या मधला होणार त्रास हा मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकतो.
४.निसर्गाच्या ठिकाणी जाताना कोणत्या हि पानाफुलांना स्पर्श करणे, दगड उचलणे, बिळांमध्ये हात टाकणे ह्या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्या. ह्या ठिकाणी अॅलर्जी होण्याची अथवा सर्पदंश,कीटकदंश होण्याची अधिक शक्यता असते. तसेच कोणतीही मोठी इजापत झाल्यास किंवा फ्रॅक्चर झाल्यास योग्य प्राथमिक उपचार करून, पुढे कोणते हि प्रयोग न करता त्या व्यक्तीला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचवावे.
*बॅग पॅकिंग* - पावसाळ्यात एखादी कपड्याची जोड, नॅपकिन किंवा टॉवेल, मोबाईल व पोर्टेबल चार्जर, टॉर्च व अतिरिक्त बॅटरी, कटलरी, स्टीलची प्लेट व ग्लास, औषधांचा किट, पावसाळी जॅकेट, कानटोपी, कॅमेरा इत्यादी आवश्यक गोष्टी एखाद्या जाड प्लास्टिक रेनकोट मध्ये गुंडाळून बॅग मध्ये भरावे.
*विशेष आहार* - पावसाळ्यामध्ये शरीराला उपयुक्त पदार्थ म्हणजे ठेपले, भाजणीचे थालीपीठ, शेंगदाणा - खोबऱ्याची चिक्की, लसूण खोबऱ्याची चटणी, गरम दूध, मूंग डाळ आमटी किंवा वरण किंवा सूप , भात, तूप-चपाती-साखर, उडीदाचे लाडू.
*पिण्याचे पाणी* - स्वतः जवळ किमान २ लिटर पिण्याचे स्वच्च पाणी असावे. सुंठ / पिंपळी सिद्ध जल वापरल्यास अधिक उत्तम. (वैद्यकीय सल्ल्याने )
*वर्ज्य* - बेकरी पदार्थ म्हणजे पाव, ब्रेड, कड धान्य, वाटाणा कोरडे पदार्थ म्हणजे कुरमुरे, कोल्डड्रिंक
*कपडे* - पूर्ण बाह्यांचे टी - शर्ट , ट्रॅक पॅन्ट शक्यतो ज्या लवकर वाळत आणि पावसात भिजून वजनाला जड होणार नाही, कानटोपी, स्कार्फ , इअर प्लग इ.
*पादत्राणे* - पायामधे शक्यतो ट्रेकिंग चे उत्तम पकड असलेले बूट किंवा फ्लोटर सँडल घालावी. एक जोड मोजे ज्यादा सोबत ठेवावे. परतीच्या प्रवासात पायात कोरडे मोजे घालावे.
*शेवटचे पण अत्यंत महत्वाचे.*
१. गडावर जाताना काळजीपूर्वक जाणे. फोटोग्राफी मध्ये सेल्फी चा मोह टाळून गडावरील अवशेष आणि गडकोटांचे दृश्य छायाचित्रात टिपावे. हे फोटो पुढच्या अभ्यास मोहीम साठी व डॉक्युमेंटेशन च्या कामाला येतात.
२. गडभेट करत असताना गडावर कोणत्याच प्रकारचा कचरा करू नये किंबहुना आढळल्यास तो गडाखाली घेऊन यावा आणि गावामध्ये एकाजागी जमा करावा.
३. गडावरील कोणतेही अवशेष, दगड इत्यादी उचलून हलवण्याचा किंवा सोबत घेऊन येऊन नये.
४. आपण जात असलेल्या गडावर तिथल्या नैसर्गिक स्थितीमध्ये वाढणाऱ्या रोपांचे वृक्षारोपण आणि त्यांचा संवर्धन केल्यास पुढील काही वर्षांमध्येच आपण आपल्या पुढच्या पिढीकरिता एक हिरवा सहयाद्री उभा करू शकतो.
*डॉ. तेजस वसंत लोखंडे,*
*आयुर्वेदाचार्य व*
*अध्यक्ष, स्वास्थ्यरंग गडभेट.*
*९७७३२६७००१*
www.facebook.com/swasthyarang
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा