धुक्यात हरवलेला हरिशचंद्र गड - डॉ. नरेंद्र कदम.
आषाढ आणि धो-धो पाऊस हे अतुट नाते. इंग्रजी कालगणनेनुसार हा साधारणत: जुलैचा महिना. २५ जुलै २००५ च्या आठवणी अजून लोकांच्या मनातून पूर्णपणे पुसल्या गेल्या नाहीत, या वर्षीही २००५ची काहीशी आठवण या पावसाने मुंबईकरांना करून दिली होती. खरंतर मुंबईकरांसाठी पावसाचे हे दिवस म्हणजे निरनिराळे ट्रेक आयोजित करणे आणि वर्षभरासाठी निसर्गाचा सहवास मनाच्या कोपऱ्यात भरभरून साठवून ठेवणे.
अशाच अपेक्षेने चावंडची ट्रेक केली होती पण हायरे दैवा! पावसाने अशी काही ओढ दिली की अक्षरशः रणरणत्या उन्हात हा पावसाळी ट्रेक पार पडला. कमीतकमी २२ जुलैला होणाऱ्या हरिश्चंद्राच्या ट्रेकला अशी परिस्थिती उद्भवू नये ही मनोमन भावना प्रत्येक जण मनोमनी व्यक्त करत होता.
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडावर अनुभवण्याचा अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्रातील ऊंच शिखरातील एक, तारामती शिखर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, आपल्या प्राचीन कलाविष्काराची ओळख करून देणारी पुष्करणी, गडावर निवास करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनेक गुफा, लेणी, ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीसाठी वाघावर बसून जाणाऱ्या चांगदेवांनी १४००० वर्ष तपस्या केलेली गुफा, चार युगांचे प्रतिक असलेल्या चार खांबांखाली असलेली केदारेश्वराची पिंडी, या खांबांशी जोडली असलेली एक आख्यायिका अशी की, प्रत्येक खांब हा एका युगाचे प्रतिक आहे आणि एक खांब हा प्रत्येक युगांती भंग पावतो म्हणून सध्या चालू कलीयुगाचे प्रतीक म्हणून एकाच सुस्थितीत असलेल्या खांबावर तोललेली केदारेश्वराची गुहा, आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आपल्या अनोख्या रौद्र सौंदर्याने वेड लावेल असा कोकणकडा आणि भाग्यवंताला दर्शन होईल असे इंद्रवज्र..
विविध निसर्ग सौंदर्याने नटलेला *अग्निपुराण आणि मत्स्यपुराणात* उल्लेख असलेला, १२व्या शतकापासून यादव राजांची निर्मिती असलेला आणि मुघलांच्या व मराठयांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व असलेला हा गड म्हणूनच ट्रेकर्सच्या यादीत खुप वरचे स्थान प्राप्त करून आहे.
२२ जुलैला गडभेटतर्फे हरिश्चंद्राच्या भेटीला जायला मिळणार म्हणून प्रत्येकाच्या मनात खुप उत्साह होता. वयोमानाप्रमाणे रात्री जागरण आणि दुसऱ्या दिवशी ट्रेक जमेल याची खात्री नव्हती म्हणून आदल्या रात्रीच पाचनईच्या मुक्कामी पोहोचण्याचा विचार करून गडाच्या पायथ्याला पोहोचलो. रात्रीच्या मिट्ट काळोखात गडाच्या विशालतेची जाणीव करून देणारा धबधब्यांचा आवाज आणि मधूनच चंद्राच्या किरणांनी उजाळून उठणारे गडाचे कडे रात्रीच मनात रुंजी घालू लागले होते. सकाळी बाकीचे साथीदार लवकरच येतील आणि गडाची चढाई चालू होईल अशा विचाराने डोळ्याला डोळा लागणे कठीणच होते, त्यात रात्रभर बाहेर तुफान पावसाच्या थैमानाचा आवाज चालू होता. सकाळी उजेड पडण्यापूर्वीच सकाळची कामे आटोपून आडोशाला उभे राहून येणाऱ्या बसची वाट पहात गडाच्या दर्शनाची आराधना करत होतो. नुकतेच कुठे फटफटू लागले होते, उजेडाची तिरीप गडावर पडायला लागली होती आणि गडाचे विशाल रूप नजरेसमोर येऊ लागले. गगनाला गवसणी घालतील असे ऊंच बेलाग कडे त्यातून खाली पडणारे आक्राळ विक्राळ धबधबे, गडाच्या विशालतेची जाणीव करून देत होते. रात्रीपासूनच मी म्हणणारा पाऊस आणि चारदोन फुटांवरचे पण दिसू न देणारे धुके मनाचा थरकाप उडवून देत होते. सहसा वेळ न चुकवणारे आमचे साथी चक्क दोन अडीच तास उशिरा पोहोचले. मनात एक शंकेची पाल चुकचुकायला लागली. निसर्गाच्या या रौद्रावताराचा संकेत मानून निमूटपणे जवळ असलेल्या भंडारदरा धरणाला भेट देऊन शांतपणे घरी जाण्याचा शहाणपणा करावा असं ही वाटू लागलं होत, पण बाकीच्यांच्या समोर हे बोलून आपला भ्याडपणा सिद्ध करायची हिम्मत झाली नाही.
आधीच झालेला उशीर आणि समोरचा निसर्गाचा अवतार लक्षात घेऊन कोणीही न सांगता प्रत्येकाने कमीतकमी वेळेत आपली तयारी करून निसर्गाच्या कुशीत शिरायची सिद्धता केली. आलेल्या सगळ्यांची औपचारिक ओळख करून ट्रेक सुरु झाला. बऱ्याच जणांनी हरिश्चंद्राला आधी भेट दिली होती परंतु या निसर्गाच्या चमत्काराची साद आज पुन्हा त्यांना गडाकडे घेऊन आली होती. ट्रेक सुरु होताच पावसाची एक जोरदार सर सगळ्यांना सलामी देऊन गेली. पावसापासून बचावाची थातुर मातुर साधने घेऊन आलेल्यांची धावपळ सुरु झाली आणि त्यांनी जी मिळतील ती साधने घेऊन आपला बचाव मजबूत करावयाची तजवीज केली. पण कोणाला माहीत होत की आपला हा बचाव आज अगदीच तकलादू ठरणार आहे.
पावसाचा मारा अंगावर झेलत शेवटी एकदा सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणून श्रीगणेशा केला आणि महादेवाचं नामस्मरण करून जय भवानी जय शिवाजीची डरकाळी फोडून निसर्गाचा सामना सुरु केला. प्रत्येकजण जणू निसर्गाला आव्हान देऊन गड सर करायला सिद्ध झाला. मजल दर मजल करीत पावसाने ओलेचिंब भिजून पहिला पडाव पार झाला. खरी लढाई आता सुरु होणार होती. जसं जसं गडावर पुढे सरकत होतो तसं-तसं धुके दाट होत होतं. पण नशीब बलवत्तर होत, धुक्याच्या जोडीला बेफाम वारा घोंघावत होता. क्षणात वारा धुकं हलवून टाकत होता त्यामुळे पुढची मार्गक्रमणा शक्य होत होती. दगडाच्या चढणीपाशी आल्यानंतर लक्षात आले की सतत कोसळणाऱ्या पावसाने शेवाळाचा थर दगडांवरती तयार झाला आहे आणि त्यावर पाऊल टिकवणं मोठ्या जिकिरीचं काम आहे. हे कमी म्हणून सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पावसाची एक धुमशान सर आली. शरीराच्या उघड्या भागावर लक्ष-लक्ष टोचणाऱ्या सुयांच्या भावनांनी पावसाचा थेंब शरीराचा वेध घेत होता. वाऱ्याच्या झोतासमोर उभे राहणे ही एक मोठी कसरत होती. काही क्षणात साऱ्याच्या हृदयाचा थरकाप उडवून पावसाची सर शांत झाली. वाऱ्याच्या झोतासमोर स्थिरपणे उभे रहाणे अजूनही शक्य होत नव्हते म्हणून काही क्षणांसाठी खाली बसणे सोयीस्कर असे समजून सगळ्यांनी आपले बस्तान मांडले. वाऱ्याचा वेग कमी झाल्यावरच पुढची मार्गक्रमणा सुरु झाली. पहिला चढ संपून कातळाच्या बाजूने जाणारा समतल रस्ता डोंगराला वळसा घालताना दिसत होता. जस-जस वळणाच्या जवळ जाऊ लागलो तसा वरून पडणाऱ्या धबधब्याचा आवाज कानी पडू लागला. माणसाचं मन किती वेड असतं नाही? एवढ्या प्रचंड पावसात गडाची चढाई केल्यानंतरही धबधबा दिसल्या बरोवर सगळेच वरून पडणाऱ्या पाण्याखाली भिजायला धावत सुटले. साधारण दीडेकशे फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्यात मनसोक्त बागडून पुढच्या मार्गाक्रमणेला सुरुवात झाली. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने वरून येणारे सारे ओघळ दुथडी भरून वाहात होते, अलीकडच्या डोंगरावरून पलीकडच्या डोंगरावर जाण्यासाठी असाच एक ओढा पार करण आवश्यक होत. पाण्याच्या या प्रवाहाला पार करणे दिसत होत तेवढ सोपे नव्हते याची जाणीव पाण्यात पाऊल टाकल्या बरोबर लगेच झाली. ट्रेकर्सकडे या साऱ्या प्रश्नांची उत्तरे तयारच असतात बहुतेक, या ओढ्याला ओलांडण्यासाठी सगळ्यांनी मानवी साखळी करून वहात्या पाण्याला शरण करून घेतले. आता खर आम्ही गडाच्या डोंगराच्या चढणीला सुरुवात केली, छोट्याशा पायवाटेने पुढचा चढ चढून जायचा होता. पायाखाली मातीचा रस्ता आणि त्या रस्त्यातून वरून खाली आपला मार्ग काढणारे पाणी आणि खालून वर मार्ग काढणारे आम्ही, जोरदार जुगलबंदी चालू झाली. चिखलामुळे निसरडा झालेला रस्ता त्यात मध्ये मध्ये छोटेमोठे दगड, सटासट आम्हाला खाली पाडायचा प्रयत्न करीत होते. या साऱ्या समस्यांवर मात करत करत, शेवटी एकदाचे आम्ही गडावर पोहोचलो.
निसर्गाच्या ज्या चमत्काराला नजरेत सामाऊन घेण्याच्या अट्टाहासाने चढाई करून आलेले सारे जीव क्षणभर विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ झाले. चिऊकाऊचा छोटासा घास तोंडात घेऊन घोटभर पाण्याने घसा ओला करून तारामती शिखराच्या पायथ्यापासून हरिश्चंद्रेश्वराच्या देवळाजवळ पोहोचले. निसर्ग पुन्हा एकदा आमची परीक्षा घ्यायला सज्ज झाला. आजूबाजूला सगळे धुक्याचे साम्राज्य वाढायला लागले, अगदी हाकेच्या अंतरावरचेही दिसेनासे झाले. ज्यांना गडाची माहिती होते ते हरिश्चंद्रेश्वराच्या जवळच उभे राहून गडाची आणि मंदिराची माहिती सांगत होते पण धुक्यामुळे पाच फुटावरचे मंदिरही मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्याशिवाय नजरेत आले नव्हते. थोडा वेळ थांबून धुके विरण्याची वाट पहात हरिश्चंद्रेश्वराची यथासांग पूजा करून झाली, जवळ असलेल्या गुफेतल्या गणेशाचीही पूजा आणि आरती करून कोकणकड्याची वाट दाखवण्याची मनधरणी करून झाली. धुके विराण्याऐवजी अजूनच दाट होत चालले होते. घड्याळाचा काटाही परतीची वेळ निघून गेली आहे हे निक्षून सांगत होता. परतीच्या मार्गाला लागण्याचा मनाचा अजून निर्धार होत नव्हता, मनात अंधुकशी आशा होती, केलेल्या प्रार्थनेला यश मिळेल आणि कोकणकाड्याची वाट नजरेस पडेल असे वाटत होते.
या अखंड विश्वात मानव प्राणी निसर्गापुढे किती क:पदार्थ आहे याची अनुभूती आम्ही अनुभवत होतो, निसर्गाला आव्हान देण हे मानवाच्या आवाक्यातली गोष्ट नाही हे प्रत्येकजण जाणून होता आणि म्हणूनच ट्रेकर्सच्या अलिखित नियमांनुसार निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काही करणे म्हणजे आत्मघात करणे हे स्मरून धुक्यात हरवलेल्या या हरिश्चंद्र गडाला पुन्हा भेट देण्याचा निर्णय घेवून परतीच्या प्रवासाची वाट धरली. गडाच्या या ऐतिहासिक वारशांचा अनुभव घ्यायचा म्हणून मोठ्या आशेने आलेली मंडळी नाराजीने पुन्हा एकदा गडाची चढाई करण्याच्या ठाम निश्चयाने आपली पावले ओढत गडउतार होऊ लागली.
खरच निसर्गापुढे माणूस किती क्षुद्र आहे. आपल्या अफाट बुद्धिमत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या आणि विज्ञानाच्या साथीने निसर्गावर सतत अत्याचार करणाऱ्या मानवाला निसर्गावर कधीच विजय मिळवता येणार नाही हे त्रिकालातीत सत्य आहे. क्षणभरात होत्याच नव्हत करण्याची ताकत असलेल्या आणि त्याची क्षमता मान्य असणाऱ्या आमच्यासारख्या पामरांना आपल्या निरनिराळ्या रंगांच्या उधळणीने आनंदी करणाऱ्या निसर्गराजाला त्रिवार प्रणाम.
डॉ. नरेंद्र कदम.
9869061889
drnbkadam@gmail.com