स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

धुक्यात हरवलेला हरिशचंद्र गड - डॉ. नरेंद्र कदम.


धुक्यात हरवलेला हरिशचंद्र गड - डॉ. नरेंद्र कदम.

आषाढ आणि धो-धो पाऊस हे अतुट नाते. इंग्रजी कालगणनेनुसार हा साधारणत: जुलैचा महिना. २५ जुलै २००५ च्या आठवणी अजून लोकांच्या मनातून पूर्णपणे पुसल्या गेल्या नाहीत, या वर्षीही २००५ची काहीशी आठवण या पावसाने मुंबईकरांना करून दिली होती. खरंतर मुंबईकरांसाठी पावसाचे हे दिवस म्हणजे निरनिराळे ट्रेक आयोजित करणे आणि वर्षभरासाठी निसर्गाचा सहवास मनाच्या कोपऱ्यात भरभरून साठवून ठेवणे.
अशाच अपेक्षेने चावंडची ट्रेक केली होती पण हायरे दैवा! पावसाने अशी काही ओढ दिली की अक्षरशः रणरणत्या उन्हात हा पावसाळी ट्रेक पार पडला. कमीतकमी २२ जुलैला होणाऱ्या हरिश्चंद्राच्या ट्रेकला अशी परिस्थिती उद्भवू नये ही मनोमन भावना प्रत्येक जण मनोमनी व्यक्त करत होता.
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडावर अनुभवण्याचा अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्रातील ऊंच शिखरातील एक, तारामती शिखर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, आपल्या प्राचीन कलाविष्काराची ओळख करून देणारी पुष्करणी, गडावर निवास करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनेक गुफा, लेणी,  ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीसाठी वाघावर बसून जाणाऱ्या चांगदेवांनी १४००० वर्ष तपस्या केलेली गुफा, चार युगांचे प्रतिक असलेल्या चार खांबांखाली असलेली केदारेश्वराची पिंडी, या खांबांशी जोडली असलेली एक आख्यायिका अशी की, प्रत्येक खांब हा एका युगाचे प्रतिक आहे आणि एक खांब हा प्रत्येक युगांती भंग पावतो म्हणून सध्या चालू कलीयुगाचे प्रतीक म्हणून एकाच सुस्थितीत असलेल्या खांबावर तोललेली केदारेश्वराची गुहा, आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आपल्या अनोख्या रौद्र सौंदर्याने वेड लावेल असा कोकणकडा आणि भाग्यवंताला दर्शन होईल असे इंद्रवज्र..
विविध निसर्ग सौंदर्याने नटलेला *अग्निपुराण आणि मत्स्यपुराणात* उल्लेख असलेला, १२व्या शतकापासून यादव राजांची निर्मिती असलेला आणि मुघलांच्या व मराठयांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व असलेला हा गड म्हणूनच ट्रेकर्सच्या यादीत खुप वरचे स्थान प्राप्त करून आहे.
२२ जुलैला गडभेटतर्फे हरिश्चंद्राच्या भेटीला जायला मिळणार म्हणून प्रत्येकाच्या मनात खुप उत्साह होता. वयोमानाप्रमाणे रात्री जागरण आणि दुसऱ्या दिवशी ट्रेक जमेल याची खात्री नव्हती म्हणून आदल्या रात्रीच पाचनईच्या मुक्कामी पोहोचण्याचा विचार करून गडाच्या पायथ्याला पोहोचलो. रात्रीच्या मिट्ट काळोखात गडाच्या विशालतेची जाणीव करून देणारा धबधब्यांचा आवाज आणि मधूनच चंद्राच्या किरणांनी उजाळून उठणारे गडाचे कडे रात्रीच मनात रुंजी घालू लागले होते. सकाळी बाकीचे साथीदार लवकरच येतील आणि गडाची चढाई चालू होईल अशा विचाराने डोळ्याला डोळा लागणे कठीणच होते, त्यात रात्रभर बाहेर तुफान पावसाच्या थैमानाचा आवाज चालू होता. सकाळी उजेड पडण्यापूर्वीच सकाळची कामे आटोपून आडोशाला उभे राहून येणाऱ्या बसची वाट पहात गडाच्या दर्शनाची आराधना करत होतो. नुकतेच कुठे फटफटू लागले होते, उजेडाची तिरीप गडावर पडायला लागली होती आणि गडाचे विशाल रूप नजरेसमोर येऊ लागले. गगनाला गवसणी घालतील असे ऊंच बेलाग कडे त्यातून खाली पडणारे आक्राळ विक्राळ धबधबे, गडाच्या विशालतेची जाणीव करून देत होते. रात्रीपासूनच मी म्हणणारा पाऊस आणि चारदोन फुटांवरचे पण दिसू न देणारे धुके मनाचा थरकाप उडवून देत होते. सहसा वेळ न चुकवणारे आमचे साथी चक्क दोन अडीच तास उशिरा पोहोचले. मनात एक शंकेची पाल चुकचुकायला लागली. निसर्गाच्या या रौद्रावताराचा संकेत मानून निमूटपणे जवळ असलेल्या भंडारदरा धरणाला भेट देऊन शांतपणे घरी जाण्याचा शहाणपणा करावा असं ही वाटू लागलं होत, पण बाकीच्यांच्या समोर हे बोलून आपला भ्याडपणा सिद्ध करायची हिम्मत झाली नाही.
आधीच झालेला उशीर आणि समोरचा निसर्गाचा अवतार लक्षात घेऊन कोणीही न सांगता प्रत्येकाने कमीतकमी वेळेत आपली तयारी करून निसर्गाच्या कुशीत शिरायची सिद्धता केली. आलेल्या सगळ्यांची औपचारिक ओळख करून ट्रेक सुरु झाला. बऱ्याच जणांनी हरिश्चंद्राला आधी भेट दिली होती परंतु या निसर्गाच्या चमत्काराची साद आज पुन्हा त्यांना गडाकडे घेऊन आली होती. ट्रेक सुरु होताच पावसाची एक जोरदार सर सगळ्यांना सलामी देऊन गेली. पावसापासून बचावाची थातुर मातुर साधने घेऊन आलेल्यांची धावपळ सुरु झाली आणि त्यांनी जी मिळतील ती साधने घेऊन आपला बचाव मजबूत करावयाची तजवीज केली. पण कोणाला माहीत होत की आपला हा बचाव आज अगदीच तकलादू ठरणार आहे.
पावसाचा मारा अंगावर झेलत शेवटी एकदा सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणून श्रीगणेशा केला आणि महादेवाचं नामस्मरण करून जय भवानी जय शिवाजीची डरकाळी फोडून निसर्गाचा सामना सुरु केला. प्रत्येकजण जणू निसर्गाला आव्हान देऊन गड सर करायला सिद्ध झाला. मजल दर मजल करीत पावसाने ओलेचिंब भिजून पहिला पडाव  पार झाला. खरी लढाई आता सुरु होणार होती. जसं जसं गडावर पुढे सरकत होतो तसं-तसं धुके दाट होत होतं. पण नशीब बलवत्तर होत, धुक्याच्या जोडीला बेफाम वारा घोंघावत होता. क्षणात वारा धुकं हलवून टाकत होता त्यामुळे पुढची मार्गक्रमणा शक्य होत होती. दगडाच्या चढणीपाशी आल्यानंतर लक्षात आले की सतत कोसळणाऱ्या पावसाने शेवाळाचा थर दगडांवरती तयार झाला आहे आणि त्यावर पाऊल टिकवणं मोठ्या जिकिरीचं काम आहे. हे कमी म्हणून सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पावसाची एक धुमशान सर आली. शरीराच्या उघड्या भागावर लक्ष-लक्ष टोचणाऱ्या सुयांच्या  भावनांनी पावसाचा थेंब शरीराचा वेध घेत होता. वाऱ्याच्या  झोतासमोर उभे राहणे ही  एक मोठी कसरत होती. काही क्षणात साऱ्याच्या हृदयाचा थरकाप उडवून पावसाची सर शांत झाली. वाऱ्याच्या झोतासमोर स्थिरपणे उभे रहाणे अजूनही शक्य होत नव्हते म्हणून काही क्षणांसाठी खाली बसणे सोयीस्कर असे समजून सगळ्यांनी आपले बस्तान मांडले. वाऱ्याचा वेग कमी झाल्यावरच पुढची मार्गक्रमणा सुरु झाली. पहिला चढ संपून कातळाच्या बाजूने जाणारा समतल रस्ता डोंगराला वळसा घालताना दिसत होता. जस-जस वळणाच्या जवळ जाऊ लागलो तसा वरून पडणाऱ्या धबधब्याचा आवाज कानी पडू लागला. माणसाचं मन किती वेड असतं नाही? एवढ्या प्रचंड पावसात गडाची चढाई केल्यानंतरही धबधबा दिसल्या बरोवर सगळेच वरून पडणाऱ्या पाण्याखाली भिजायला धावत सुटले. साधारण दीडेकशे फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्यात मनसोक्त बागडून पुढच्या मार्गाक्रमणेला सुरुवात झाली. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने वरून येणारे सारे ओघळ दुथडी भरून वाहात होते, अलीकडच्या डोंगरावरून पलीकडच्या डोंगरावर जाण्यासाठी असाच एक ओढा पार करण आवश्यक होत. पाण्याच्या या प्रवाहाला पार करणे दिसत होत तेवढ सोपे नव्हते याची जाणीव पाण्यात पाऊल टाकल्या बरोबर लगेच झाली. ट्रेकर्सकडे या साऱ्या प्रश्नांची उत्तरे तयारच असतात बहुतेक, या ओढ्याला ओलांडण्यासाठी सगळ्यांनी मानवी साखळी करून वहात्या पाण्याला शरण करून घेतले. आता खर आम्ही गडाच्या डोंगराच्या चढणीला सुरुवात केली, छोट्याशा पायवाटेने पुढचा चढ चढून जायचा होता. पायाखाली मातीचा रस्ता आणि त्या रस्त्यातून वरून खाली आपला मार्ग काढणारे पाणी आणि खालून वर मार्ग काढणारे आम्ही, जोरदार जुगलबंदी चालू झाली. चिखलामुळे निसरडा झालेला रस्ता त्यात मध्ये मध्ये छोटेमोठे दगड, सटासट आम्हाला खाली पाडायचा प्रयत्न करीत होते. या साऱ्या समस्यांवर मात करत करत, शेवटी एकदाचे आम्ही गडावर पोहोचलो.
निसर्गाच्या ज्या चमत्काराला नजरेत सामाऊन घेण्याच्या अट्टाहासाने चढाई करून आलेले सारे जीव क्षणभर विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ झाले. चिऊकाऊचा छोटासा घास तोंडात घेऊन घोटभर पाण्याने घसा ओला करून तारामती शिखराच्या पायथ्यापासून हरिश्चंद्रेश्वराच्या देवळाजवळ पोहोचले. निसर्ग पुन्हा एकदा आमची परीक्षा घ्यायला सज्ज झाला. आजूबाजूला सगळे धुक्याचे साम्राज्य वाढायला लागले, अगदी हाकेच्या अंतरावरचेही दिसेनासे झाले. ज्यांना गडाची माहिती होते ते हरिश्चंद्रेश्वराच्या जवळच उभे राहून गडाची आणि मंदिराची माहिती सांगत होते पण धुक्यामुळे पाच फुटावरचे मंदिरही मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्याशिवाय नजरेत आले नव्हते. थोडा वेळ थांबून धुके विरण्याची वाट पहात हरिश्चंद्रेश्वराची यथासांग पूजा करून झाली, जवळ असलेल्या गुफेतल्या गणेशाचीही पूजा आणि आरती करून कोकणकड्याची वाट दाखवण्याची मनधरणी करून झाली. धुके विराण्याऐवजी अजूनच दाट होत चालले होते. घड्याळाचा काटाही परतीची वेळ निघून गेली आहे हे निक्षून सांगत होता. परतीच्या मार्गाला लागण्याचा मनाचा अजून निर्धार होत नव्हता, मनात अंधुकशी आशा होती, केलेल्या प्रार्थनेला यश मिळेल आणि कोकणकाड्याची वाट नजरेस पडेल असे वाटत होते.
या अखंड विश्वात मानव प्राणी निसर्गापुढे किती क:पदार्थ आहे याची अनुभूती आम्ही अनुभवत होतो, निसर्गाला आव्हान देण हे मानवाच्या आवाक्यातली गोष्ट नाही हे प्रत्येकजण जाणून होता आणि म्हणूनच ट्रेकर्सच्या अलिखित नियमांनुसार निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काही करणे म्हणजे आत्मघात करणे हे स्मरून धुक्यात हरवलेल्या या हरिश्चंद्र गडाला पुन्हा भेट देण्याचा निर्णय घेवून परतीच्या प्रवासाची वाट धरली. गडाच्या या ऐतिहासिक वारशांचा अनुभव घ्यायचा म्हणून मोठ्या आशेने आलेली मंडळी नाराजीने पुन्हा एकदा गडाची चढाई करण्याच्या ठाम निश्चयाने आपली पावले ओढत गडउतार होऊ लागली.
खरच निसर्गापुढे माणूस किती क्षुद्र आहे. आपल्या अफाट बुद्धिमत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या आणि विज्ञानाच्या साथीने निसर्गावर सतत अत्याचार करणाऱ्या मानवाला निसर्गावर कधीच विजय मिळवता येणार नाही हे त्रिकालातीत सत्य आहे. क्षणभरात होत्याच नव्हत करण्याची ताकत असलेल्या आणि त्याची क्षमता मान्य असणाऱ्या आमच्यासारख्या पामरांना आपल्या निरनिराळ्या रंगांच्या उधळणीने आनंदी करणाऱ्या निसर्गराजाला त्रिवार प्रणाम.

डॉ. नरेंद्र कदम.
9869061889
drnbkadam@gmail.com

पावसाळी ट्रेक आणि आरोग्यरक्षण

  *ऋतू पावसाळा - आगमन*

वर्षभरात एकूण सहा ऋतू येतात. माघापासून ते फाल्गुनपर्यंत अनुक्रमे शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत असा ऋतुबदल घडताना दिसतो. शिशिरादी तीन ऋतूंनी दक्षिणायन तयार होते तर वर्षादी तीन ऋतूंनी उत्तरायण तयार होते. दक्षिणायन मध्ये सूर्याची शक्ती अधिक असते तर उत्तरायण मध्ये चंद्राचे अधिपत्य असून चंद्र बलवान असतो, गार वारा व पाऊस ह्यांच्या योगाने पृथ्वीतील उष्णता कमी होते. दाक्षिणायनाची सुरुवात असल्याने मनुष्याचे बळ जे वर्षां ऋतूमध्ये  कमी असते ते दिवसेंदिवस वाढू लागते.  तसंच निसर्ग हि बहरू लागतो. पावसाळ्यातलं वातावरण हे गार व रुक्ष झालेले असल्याने निसर्गात आणि शरीरात वातदोषाचा प्रकोप नैसर्गिक रित्या पाहायला मिळतो.

*वात - एक नवी ओळख*

निसर्ग म्हणजेच सृष्टीतली एक जागृत शक्ती. जीवनाची आसक्ती धरत अनेक जीवजंतू जन्माला येतात तसेच लोपही पावतात. उत्पत्ती स्तिथी विनाश हा क्रम न चुकणारा आहे. हे सारे घडवून यायला शक्तीच कारणीभूत ठरते. "अव्यक्तच व्यक्त कर्म" असे विधान आयुर्वेदात वाताच्या संदर्भात मिळते. ज्याचे रूप अव्यक्त, पण  कर्माने व्यक्त होते तो म्हणजे वात अर्थात वायू. शरीरपोषणासाठी आहार घेणे, त्याचे पचन करणे,  रसरक्तादी धातूंत  रूपांतर करणे, मलमूत्रनिर्मिती आणि त्यांचे  शरीराबाहेर विसर्जन, श्वासोच्छवासादी क्रिया करणे, बोलणे , चालणे, सर्व इंद्रियांनी  आपापले विषय ग्रहण करणे , मनाचे व बुद्धीचे व्यापार घडणे, शरीर धातू परमाणूंची उत्पत्ती  व नाश नियमितपणे करणे, इत्यादी असंख्य व भिन्न पद्धतीचे व्यापार शरीरामध्ये चालत असतात. जसं वीज हा पदार्थ आपल्याला दिसू शकत नाही परंतु विद्युतशक्तीमुळे सर्वत्र प्रकाश उज्वलीत केला जातो, तसंच वाताचे रूप अव्यक्त पण कर्माने तो व्यक्त होतो.

रुक्ष:, लघु:, शीत: , खर: , सूक्ष्म: , चल: हे वाताचे गुण आहेत.  (रूक्ष म्हणजेच शोषण करणे किंवा वियोग करणे, लघु म्हणजे हलकेपणा निर्माण करणे, शीत : म्हणजे स्तंभन करणे, खर म्हणजे खरखरीतपणा किंवा खरवडणे, सूक्ष्म म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म स्रोतसांमध्ये कार्य करता येते, चल  म्हणजे गतिमान असणे. ) आता बघा ना, वात म्हटलं तर लोकांना फक्त पोटात होणारा गॅस आणि सांध्यांच्या ठिकाणी वात एवढाच काय तो परिचय.  तर हे दोन्ही वात विकारात्मक म्हणायचे का ? तर नाही ! वात जर ह्या दोन्ही ठिकाणी सुस्थितीत असेल तरच देहाची प्राकृत अवस्था टिकून राहते. ज्यावेळेस या वाताच्या गतीला अडथळा निर्माण होतो त्यावेळी परिस्थिती विकृती कडे वळायला लागते आणि मग आजारपण जन्माला येऊ लागतात. "पिंडी ते ब्रह्मांडी" म्हणतात तसंच निसर्गात असलेला वात हा मनुष्य शरीरात ही आहे. शरीरातल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाला त्यांच्या कार्यसिद्धीला नेणारा हा वातच असतो आणि निसर्गामध्ये ऋतू बदल घडवून आणणारा देखील वातच.

पित्तं पंगू कफं पंगु पंगवो मलधातव: |

वायुनां यत्र नियन्ते तत्र गच्छंती मेघवत | |

ज्याप्रमाणे आकाशातील ढगांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वायू हलवतो त्याच ठिकाणी वर्षा होते त्याच प्रमाणे हा वायु  शरीरात निष्क्रिय असलेले  पित्त-कफ-मल-धातु आदींना क्रिया किंवा हालचाल करायला भाग पाडतो. शरीरात किंवा निसर्गात राहणारी सर्वोच्च सामर्थ्यवान शक्ती हीच होय.  भूतलावरच्या जलाशयाला कोरडं करण्याचं, भूगर्भातल्या तापलेल्या लाव्हारस बाहेर फेकण्याचं, जमिनीतले अंकुर बाहेर काढणं, त्याला वाढवणं हे जसं वाताचं कार्य त्याच प्रकारे शरीरातल्या पेशींची वाढ करणे, त्यांचा विनाश करणे हे देखील वाताच्या क्षेत्रातील कामगिरी आहे. वाताला आयुर्वेदामध्ये सर्व क्रियांचा प्रणेता, सर्व क्रियांचा उद्योजक म्हटलेलं आहे. अशी ही सृष्टी आणि मनुष्य देह हे सर्वत्र ह्या वाताने व्यापलेला असून सर्व क्रिया ह्या त्याच्या अधिपत्याखालीच घडतात. तसेच या वर्षाऋतु मध्ये वात प्रकोपाचा काळ सांगितलेला आहे.

*ट्रेकिंग आणि वात*

ट्रेक म्हणजे थोडक्यात भटकंती, मग ती गड माथ्यावर असो किंवा रानावनात, ज्या मध्ये गिर्यारोहण  किंवा पदभ्रमंती  हा प्रकार करावा लागतो. हि  क्रिया करताना शारीरिक व मानसिक व्यायाम घडत असतो ज्या मध्ये शरीरामधले विविध अंगप्रत्यंग सक्रियतेने सहभागी असतात. कंबर (कटी ) आणि त्या खाली असलेल्या मांड्या (सक्थि) ,गुडघे (अस्थी - संधी ), पाय, तळवे  ह्या ठिकाणी असलेल्या हाडांचा उपयोग चढताना करावा लागतो. गार वारा असेल तर शरीरावरील आवरण स्वरूपी असलेली त्वचा (स्पर्शनेंद्रियं) हि ओली होऊन शरीरात गारठा वाढविण्याचं  काम करते. जोरात वाहणारा वेगवान वारा हा कानांमध्ये (श्रोत्र )  जाऊन डोकं धरणे, थंडी वाजणे, कान दुखणे ह्या सारखी दुखणी निर्माण करू शकतो. ह्या मधले सगळेच अवयव हे वाताचे प्रमुख स्थान म्हणून सांगितले आहेत.

पक्वाशय कटी सक्थि श्रोत्र अस्थी स्पर्शनेंद्रियं ।
स्थानं वातस्य  तत्रापि पक्वाधानं विशेषतः ।।
हि वाताचे प्रमुख स्थाने आयुर्वेदाने सांगितली आहेत.

ट्रेकिंग म्हटलं की पावसाळ्यात एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये पहायला मिळतो. पॅशन म्हणून फिरणारे भटके कमी, फॅशन साठी मिरवणाऱ्या लोकांच्या संख्येत भर पडली आहे . फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वर फोटोंसकट झळकणाऱ्या मंडळांची वाढ झपाट्याने दिसू लागली आहे. कौशल्याचा पुरेपूर अभ्यास नसताना केलेली भटकंती, पुरेपूर अनुभव नसल्याने केलेली भटकंती आदी कारणांनी हा खेळ जीवावर बेतू शकतो .

ट्रेकिंग साठी निरनिराळ्या ठिकाणी मित्रांसोबत, ग्रुप सोबत तर काही परिवारासोबत जाताना दिसतात. बहरलेला निसर्ग, हिरवेगार झालेल्या कातळ, धुकं दाटलेल्या दऱ्याखोऱ्या, उंचच उंच कोसळणारे धबधबे हे सारं काही मन सुखावणारे आहे. "अनुकूल वेदनियं सुखं" म्हणजे मनाला अनुकूलतेची जाण देऊन जाते ते सुख आणि हेच सुख अनुभवायला भटक्यांचे खेळ या पावसात सुरू होतो.

त्यामुळेच काही खालील बाबींवर लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

*पावसाळा ट्रेक व विशेष काळजी*

*विशेष सावधानगिरी*

१. गिर्यारोहण करताना आपण जात असलेल्या स्थळाची निवड विचारपूर्वक करून त्या पाठी मागचे उद्देश हे ठरवलेले असावे.

२. ज्या गडावर जायचे ठरते त्याचा ऐतिहासिक व भौगोलिक दृष्ट्या अभ्यास, त्याच्या नजीकच्या गावांची नावं , पायथ्याच्या गावाचं नाव, जाणारे मार्ग, गूगल नकाशा, वाहतूक  पद्धती  आणि वेळापत्रक या सगळ्या गोष्टी हाताशी बाळगाव्या.

३. पावसाळ्यात जतन तिथल्या पावसाचा अंदाज घेऊन काही रस्त्यात अडथळे निर्माण झालेत का किंवा काही धोक्याचे चिंन्ह आहेत का हि माहिती काही संबंधित स्थानिक लोकांशी  बोलून प्राप्त करून घ्यावी.

४. गडावर जाताना सोबत अनुभवी व्यक्ती आणि योग्य माहिती असणे अत्यावश्यक अथवा गावातून एखादा जाणकार व्यक्ती गाईड म्हणून सोबत घ्यावा.

५. गडावर फिरताना निरीक्षणाच्या गोष्टी -  गाडाची रचना आणि वैशिष्ट्य, वन-वन्य जीवन, विविध फुले, किटक, सभोवतालच्या परिसरातील डोंगररांग  इ.

६. ट्रेक ला कोणत्याही पद्धतीचा  निष्काळजीपणा व अति साहस करू नये.

७. आपण ज्या ट्रेक ग्रुप सोबत जात आहोत त्याची खरीखुरी माहिती आणि  त्यांचे दूरध्वनी क्रंमांक आपत्कालीन संपर्कासाठी आपल्या घरी देऊन ठेवावे.

*आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी*

१. गडभेटला जाण्यापूर्वी आपला स्वास्थ्य तपासणी करून घेणे अथवा आपल्या फॅमिली डॉक्टरांकडुन  फिटनेस जाणून घेणे अत्यावश्यक.

२. दमा , अॅलर्जी, ब्लड प्रेशर सारखे आजार असल्यास त्याची कल्पना आपण जात असलेल्या ट्रेक ग्रुप च्या ट्रेक लीडर ला देणे अत्यावश्यक आहे.

३. ट्रेक ला जात असताना आपला वैयक्तिक प्रथोमोपचार किट आणि स्वतःला लागणारी औषधें सोबत ठेवावी.

३. पावसाळ्यात ट्रेक करताना शरीरामध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि हळू हळू हा शरीरामधल्या हाडांना कमकुवत करून सांध्यांच्या  ठिकाणी वेदना उत्पन्न करून काही वर्षांनी ट्रेक मध्ये अडथळे निश्चित आणू  शकतो. दूरदृष्टीने हे टाळण्याकरिता वातावरचे उपक्रम म्हणजे  तेलाने सर्वांगाला स्नेहन, उष्ण स्वेद, तेलाचा अभ्यंग, तेलाचा बस्ती (एनिमा) , आभ्यंतर स्नेहपान हे  वैद्यकीय सल्ल्याने केल्यास ह्या मधला होणार त्रास हा मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकतो.

४.निसर्गाच्या ठिकाणी जाताना कोणत्या हि पानाफुलांना स्पर्श करणे, दगड उचलणे, बिळांमध्ये हात टाकणे ह्या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्या. ह्या ठिकाणी अॅलर्जी होण्याची अथवा सर्पदंश,कीटकदंश होण्याची अधिक शक्यता असते. तसेच कोणतीही मोठी इजापत  झाल्यास किंवा फ्रॅक्चर झाल्यास  योग्य प्राथमिक उपचार करून, पुढे कोणते हि प्रयोग न करता त्या व्यक्तीला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचवावे.

*बॅग पॅकिंग* - पावसाळ्यात एखादी कपड्याची जोड, नॅपकिन किंवा टॉवेल, मोबाईल व पोर्टेबल चार्जर, टॉर्च व अतिरिक्त बॅटरी, कटलरी, स्टीलची प्लेट व ग्लास, औषधांचा किट, पावसाळी जॅकेट, कानटोपी, कॅमेरा  इत्यादी आवश्यक गोष्टी एखाद्या जाड प्लास्टिक रेनकोट मध्ये गुंडाळून बॅग मध्ये  भरावे.

*विशेष आहार* - पावसाळ्यामध्ये शरीराला  उपयुक्त  पदार्थ म्हणजे ठेपले, भाजणीचे  थालीपीठ, शेंगदाणा - खोबऱ्याची  चिक्की, लसूण खोबऱ्याची चटणी, गरम दूध, मूंग डाळ आमटी किंवा वरण किंवा सूप  , भात, तूप-चपाती-साखर, उडीदाचे लाडू.

*पिण्याचे पाणी* - स्वतः जवळ किमान २ लिटर पिण्याचे स्वच्च पाणी असावे.  सुंठ / पिंपळी  सिद्ध जल वापरल्यास अधिक उत्तम. (वैद्यकीय सल्ल्याने )

*वर्ज्य*  - बेकरी पदार्थ म्हणजे पाव, ब्रेड, कड धान्य, वाटाणा  कोरडे पदार्थ म्हणजे कुरमुरे, कोल्डड्रिंक

*कपडे*  - पूर्ण बाह्यांचे टी - शर्ट , ट्रॅक पॅन्ट  शक्यतो ज्या लवकर वाळत आणि पावसात भिजून वजनाला जड  होणार नाही, कानटोपी, स्कार्फ , इअर  प्लग इ.

*पादत्राणे*  - पायामधे शक्यतो ट्रेकिंग चे उत्तम पकड असलेले बूट किंवा फ्लोटर सँडल  घालावी. एक जोड मोजे ज्यादा सोबत ठेवावे. परतीच्या प्रवासात पायात कोरडे मोजे घालावे.

*शेवटचे पण अत्यंत महत्वाचे.*

१. गडावर जाताना काळजीपूर्वक जाणे. फोटोग्राफी मध्ये सेल्फी चा मोह टाळून गडावरील अवशेष आणि गडकोटांचे दृश्य छायाचित्रात टिपावे. हे फोटो पुढच्या अभ्यास मोहीम साठी व डॉक्युमेंटेशन च्या कामाला येतात.

२. गडभेट करत असताना गडावर कोणत्याच प्रकारचा कचरा करू नये किंबहुना आढळल्यास तो गडाखाली घेऊन यावा आणि गावामध्ये एकाजागी जमा करावा.

३. गडावरील कोणतेही अवशेष, दगड इत्यादी उचलून हलवण्याचा किंवा सोबत घेऊन येऊन नये.

४. आपण जात असलेल्या गडावर तिथल्या नैसर्गिक स्थितीमध्ये वाढणाऱ्या रोपांचे  वृक्षारोपण आणि त्यांचा संवर्धन  केल्यास पुढील काही वर्षांमध्येच आपण आपल्या पुढच्या पिढीकरिता एक हिरवा सहयाद्री उभा करू शकतो.

*डॉ. तेजस वसंत लोखंडे,*

*आयुर्वेदाचार्य व*

*अध्यक्ष, स्वास्थ्यरंग गडभेट.*

*९७७३२६७००१*

www.facebook.com/swasthyarang