Swasthyarang || स्वास्थ्यरंग ||
.....तना-मनाची काळजी घेण्यात दंग
आरोग्यरक्षण - काळाची गरज -वैद्य तेजस लोखंडे
अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद - डॉ. तेजस लोखंडे.
🌿 *अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद* 🌿
*- डॉ. तेजस लोखंडे.
*🌿अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद.*
दिवाळी म्हटलं की आठवतं ते अभ्यंग स्नान आणि मग हळूच पाय वळू लागतात ते मोती साबण घ्यायला. पण खरंच सांगू का, अभ्यंग स्नान म्हणजे फासला साबण आणि झाला अभ्यंग असं खरंच नाही. अभ्यंग स्नान ही एक शास्त्रशुद्ध संकल्पना आयुर्वेदाने कित्येक हजार वर्षांपूर्वी ग्रंथात मांडून दिली आहे.
अभ्यंग ह्याचा साधा सोप्पा अर्थ सांगायचा झाला तर नित्य नियमाने सर्वांगाला तेल लावून स्नेहन (मालिश) करून त्वचेमध्ये तेल जिरवणे.
*दिवाळी अभ्यंग स्नान* :
दिवाळी हा शरद ऋतू मध्ये येणारा सण. ह्या ऋतू मध्ये बाहेरील हवामान हे उष्ण आणि रुक्ष झाल्याने शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप ( वाढणे) होतो. उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत मुत्राचे प्रमाण कमी होऊन शरीरातील क्लेद (मल भाग) हा मूत्र मार्गाने कमी आणि स्वेद (घामातून) त्वचामार्गाने अधिक बाहेर पडतो. आयुर्वेदात त्वचा हे वाताचे स्थान सांगितले असून, स्वेदवह स्त्रोतसाच्या अधिक कर्मशीलते मुळे आणि वातावरण कोरडे झाल्याने त्वचा ही कोरडी पडायला लागते. त्यामुळे ह्या काळात अभ्यंग म्हणजेच सर्वांगाला तेल चोळून त्वचेचा स्निग्धपणा टिकवण्यासाठी मदत होते. तेलाच्या स्निग्ध गुणामुळे हे कार्य सिद्धीस जाते.
*अभ्यंग विधी आणि कार्य :*
आपल्या प्रकृती अनुसार वैद्यकीय सल्याने योग्य तेल निवडून ते साधारण कोमट करून सकाळी प्रातः विधी पार पाडून सर्वांगाला तेल लावून जिरवावे. तळवे, पाय, कंबर, पोट, छाती, हाथ, मान, चेहरा, मस्तक ह्या सगळ्या स्थांनाना कोमट तेलाने खालून वर अश्या एकाच दिशेने हाथ फिरवत तेल जिरावावे. हे करत असताना आपल्या परिसरात हवा वाहत नसेल (पंखा, एसी चालू नसावा) ह्याची खबरदारी घावी.
कोमट तेलाने अभ्यंग केल्याने शरीरातील त्वचेच्या आधारे राहणारा वात दोष ह्याचे शमन होते, त्वचेखाली असलेल्या स्वेद नलिका प्रसारण पावून मोकळ्या होत शरीरातील क्लेद (मल भाग) बाहेर यायला सहज मदत होते.
एवढे करून झाल्यावर साधारण अर्धा तास थांबून मग पुढील प्रक्रियेकडे वळावे.
*उद्वर्तन / उटणे :*
उद्वर्तन म्हणजेच सुगंधी द्रव्यांच्या चूर्णांनी शरीराला घर्षण करणे. या मध्ये त्रिफळा, सारिवा, नागरमोथा आदी द्रव्यांचा वापर केला जातो. तेलाभ्यंगामुळे शरीरातून बाहेर पडलेल्या क्लेदाला घर्षण म्हणजेच उद्वर्तन करून ह्या चूर्णाच्या सहायाने घासून मोकळे करायला मदत होते. शिवाय त्वचेखाली साचलेला मेद (अनावश्यक चरबी) ही कमी व्हायला मदत होते.
*उद्वर्तन / उटणे वापरण्याचा विधी :*
बाजारातून उटणे विकत न घेता आपल्या आयुर्वेदीय डॉक्टरांकडून उटणे चूर्ण बनवून घेणे.
त्वचा अधिक कोरडी असलेले / लहान मुलांसाठी - उटण्यामध्ये खोबरेल तेल किंवा दूध मिश्र करावे.
तेलकट त्वचा असलेल्यांनी त्या चूर्णामध्ये पाणी / नारळाचे पाणी टाकून वापरावे.
तेलाभ्यंग करून अर्ध्या तासाने हे उद्वर्तन / उटणे चूर्ण आपापल्या त्वचेनुसार योग्य द्रवातून सर्वांगाला घासावे. नंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी. आंघोळ करताना साबणाचा उपयोग मात्र टाळावा.
*अभ्यंग कालावधी :*
आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे रोज अभ्यंग करावे आणि शक्य नसल्यास निदान आठवड्यातून ३ - ४ वेळेस तरी किमान करावे. सकाळी प्रातः विधी संपवून अथवा रात्री झोपण्यापूर्वी करावे.
*अभ्यांगाचे प्रकार आणि फायदे :*
*१. शिरोभ्यंग* - मस्तिष्क भागाला तेल लावणे. ह्या मुळे डोकं शांत होते, ताण तणावापासून आराम मिळतो, शांत झोप लागते, मन एकाग्र होण्यास मदत होते.
*२. कर्ण पूरण* - करंगळीला कोमट तेलामध्ये बुडवून दोन्ही कानामध्ये तेल लावणे. सोबत दोन्ही कानाच्या पाळीला तेल चोळणे. कान हे ही आयुर्वेदामध्ये वाताचे स्थान सांगितले आहे. शिवाय कर्ण इंद्रिय सक्षम राहण्यास मदत होते. शांत झोप लागते.
*३. नाभी पूरण* - नाभी म्हणजेच बेंबी मध्ये मावेल एवढे कोमट तेल सोडून मग तेच तेल पोट आणि ओटी पोटावर हलक्या हाताने चोळून जीरवावे. पोट आणि आसमंतातील अवयवांचे त्रास कमी होण्यास मदत होते, अजीर्ण, गॅस होणे, शौचास साफ न होणे ह्या तक्रारींवर हमखास चांगला परिणाम दिसून येतो.
*४. पादाभ्यंग* - दोन्ही पायांच्या तळव्यांना हाताने किंवा काश्याच्या वाटीने घासून तेल चोळून लावावे. ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, दृष्टीला बल प्रदान होते, ताण तणाव कमी होतो, शरीरातील कोरडेपणा नाहीसा होण्यास मदत होते, झोप शांत लागते.
*५. सर्वांग अभ्यंग* - पूर्ण शरीराला तेलाने अभ्यंग / स्नेहन करावे. वात दोषाचे शमन होते, त्वचा टवटवीत दिसते, प्रसन्न वाटते, त्वचा ही स्निग्ध आणि कोमल वाटू लागते.
*अभ्यंग तेल नियमित वापरण्याचे फायदे -*
१. त्वचेचा कोरडपणा नष्ट होतो.
२. त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होण्याकरिता उपयोगी.
३. त्वचा तेजस्वी आणि तरुण दिसते.
४.रक्त संवहन सुधारते.
५. वात दोषाचे शमन होऊन पुढे होणारे वात दोषामुळे रोग सहज टाळता येऊ शकतात.
६. सहज शांत झोप लागते, शरीर आणि मन ताण तणावातून मुक्त होते.
*उद्वर्तन / उटणे नियमित वापरण्याचे फायदे -*
१. त्वचा कोमल बनते.
२. त्वचेला निखार येतो.
३. त्वचेचा वर्ण उजळतो.
४. त्वचेवरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.
५. चेहरा तेजस्वी, प्रसन्ना दिसतो.
६. सुगंधी द्रव्यांमुळे मन प्रसन्न राहते.
७. शरीरातील अनावश्यक मेद (चरबी / वजन) कमी होण्यास मदत होते.
नियमित अभ्यंग स्नान आणि उद्वर्तन / उटणे वापरल्याने प्रत्येकाला तरुण राहणे, ताण तणावमुक्त राहणे आणि प्रसन्न राहणे सहज शक्य आहे. ह्या उपचार पद्धतीला किंवा आयुर्वेदात वर्णित ह्या दिनचर्येच्या उपक्रमांना आपलेसे करून घेतले तर निश्चितच आरोग्य रक्षण हा मंत्र दूर नव्हे. हेच उपचार आपण विविध केंद्रांमध्ये भरमसाठ खर्च करून घेण्यापेक्षा हा आपणच घरी करून आपलं आरोग्य ही निरोगी आणि प्रसन्न ठेवण्यास सहाय्य करू शकतो.
*मुखशुद्धी / मुखवास*
आयुर्वेदामध्ये जेवण झाल्यानंतर अन्नाचे पचन सुव्यवस्थित व्हावे म्हणून तांबूल सेवन (पानाचा विडा) / मुखशुद्धी ही संकल्पना सांगितलेली आहे. यामध्ये बडीशेप, जीरा, दालचिनी, लवंग आदींसोबत काही आयुर्वेदीय औषधी चूर्ण यांचे मिश्रण असल्याने याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील वात - पित्त - कफ या दोषांचे पासून होणाऱ्या व्याधींपासून रक्षण करता येते.
*मुखशुद्धी / मुखवास नियमित वापरण्याचे फायदे*
१. जेवणाचे सुयोग्य पचन होण्यास उपयुक्त.
२. पोटातील गॅसच्या तक्रारीपासून मुक्तता.
३. मुखरोग आणि दंतरोग ह्या अवस्थेत गुणकारी.
४. नियमित वापराने वजन नियंत्रण, आम्लपित्त, मलावरोध ह्या मध्ये गुणकारी.
*मुखशुद्धी / मुखवास नियमित वापरण्याची विधी -*
मुखशुद्धी चूर्ण हे एका हवाबंद डब्बीत / बाटलीत भरून ठेवणे.
दिवसभरात केलेल्या नाश्ता, जेवण ह्या नंतर पाव ते अर्धा चमचा मुखशुद्धी चूर्ण चघळावे, त्या नंतर दाताखाली बारीक चावून खाणे.
*कवच अर्क*
भीमसेनी कापूर, ओवा अर्क, पुदिना अर्क, निलगिरी तेल युक्त शास्त्रशुद्ध औषध जे करते श्वसन मार्गाची शुद्धि, आपल्या मोहक सुगंधाने घर आणि मन प्रसन्न.
*कवच अर्क नियमित वापरण्याचे फायदे*
१. सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी साठी उपयुक्त.
२. श्वसन मार्ग शुद्धीसाठी.
३. सुगंधाने घरात, मनात प्रसन्न वातावरण निर्मिती.
*कवच अर्क नियमित वापरण्याची पद्धत*
१. नाक, कपाळ, कानाच्या पाळीला अत्तर प्रमाणे लावणे.
२. वाफारा घेताना पाण्यात २ थेंब टाकावे.
३. सर्दी, खोकला, असताना रुमालावर २ थेंब घेऊन हुंगणे.
४. घरात सुगंधी धूप (diffuser) यंत्रात वापर.
*दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा.*
वरील माहितीपर लेख हा फक्त आयुर्वेदशास्त्रात वर्णन केलेल्या *अभ्यंगस्नान* या विधी संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावे, या निखळ हेतूने लिहिलेला आहे. तरी हा लेख अनेकांपर्यंत पोहचावा, ही विनंती आणि हा वैद्यकीय दृष्टीने लिहिलेला लेख, कृपया करून एडिट / बदल न करता नावासह पोस्ट करावा.
*डॉ. तेजस लोखंडे*
*|| आरोग्यं ||*
*आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र.*
*प्रतीक्षा नगर, सायन, मुंबई*
*9773267001.*
शांतता....
.
शांतता....
-(डाॅ. तेजस लोखंडे)
काय होणार ?
कसे होणार... ?
अशा प्रश्नांनी गोंधळलेले सर्वजण..
प्रसुतिगृहा बाहेर एकच शांत व गंभीर वातावरणात स्तब्ध होते. एवढ्यात एका बाळाच्या रडण्याचा टॅह्यॅ ने शांतता भंग पावते, सारे आनंदात दंग होतात.
रडणारे बाळ ही आता.... आई च्या गर्भातले शांततेचे वातावरण सोडून या अशांत ग्रहावर अवतरलेले असते.ह्या शांततेचा विचार जरी केला तरी आपण स्वतः किती शांत.. अन् संथ होऊ लागतो.
निशब्द शांतता -
अनुभवली आहे का कधी तुम्ही ??
पावसाळ्यात कोसळणारे..,
कल्लोळ करणारे..,
जणू 'मी आलोय.. मी आलोय...' असे ओरडून सांगणारे झरे...
उन्हाळ्यात किती शांत पहुड़तात ! भयान अंधारात चालताना, बाहेर चा अंधार ही कमी वाटावा इतके भय उत्पन्न करते ती ही शांतताच...
किल्ले - डोंगरांवर वार्याच्या स्पर्शात, नभाच्या रूपात, मातीच्या गंधात, कुसुमांच्या रसात, प्राणी-पक्ष्यांच्या शब्दात.... काय शांतता लाभते हे स्वतः अनुभवल्या शिवाय कळणे नाही...
सर्वश्रुत आहेचच की ,
'गर्दीत आपण एकटे असण्याचा भास आणि एकटे असताना ही गर्दीत उभा रहिल्याचा भास' हे काही नवीन नाही... पण का होता असं ??
आंब्याच्या झाडाखाली गारेगार शांतता तर गुलाबी थंडीतली शेकोटीची उबदार शांतता...
पॅरासेलिंग प्रमाणे भासनारा सुगरणीचा खोपा...
काय अजब आहे ना निसर्ग !
खाली पाण्याने भरलेली विहीर, विहिरीवर वाकलेली झाडाची नाजूक फांदी, फांदीला लोंबकळणारा खोपा अन् खोप्यामधे सुगरणीची पिल्ले.. किती आत्मविश्वास असावा ह्यां पिल्लांना.. किती शांतता वाटत असेल त्या लेकरांना जेव्हा त्यांची माय परतत असेल त्यांचे कडे.
घाबरलेल्या मुलाला आई ने छातीशी कवटाळावं...,
नवर्याने बायकोच्या केसात मोगरा माळावा...,
भरपूर अभ्यास झाल्यावर मुलांनी धाव घ्यावी खेळायला...,
मांडी वर निजलेल्या आपल्या प्रियकरला प्रेमाने कुरवाळावं....,
उपाश्याला दोन घास भरवावे,
तहानलेल्याला दोन घोट पाजावे,
ऐकणार्याला ऐकवावे...
बघणार्यांना दाखवावे....
शिकणार्याला शिकवावे...
क्षमा मागणार्याला क्षमा द्यावी,
प्रेमाला आसुसलेल्याला प्रीती द्यावी...
एकदा उनाड होऊन बेफाम वागून बघावं..
आपल्या माणसावर एकदा रागावून पहावं..
हक्काच्या ताई कडून एक शर्ट मागून घ्यावा...
लाडाने त्याच ताईला साडीची ओवाळणी द्यावी...
रात्र पूर्ण मित्रांसोबत जागून काढावी...
रंगांना.. रंगांसारखंच एकदा पाहुन बघावं...
एकदा का होईना पण.. काळ्या ला पांढरा अन् पांढर्याला काळा बोलून तर पहावं....
बाळाला आजोबाने हात धरुन फिरायला नेणं..
बाळाला निजताना आजी ने मायने थोपटावं... आणि....
आणि ह्या सार्यांना विचारावे "शांतता" कशास म्हणावे !
घरात प्रेत पडले तर माहोल शांत आणि महापुरुषांच्या समाधिस्थानात ही आसमंत...
शांतच...
एक व्यक्ति म्हणून प्रत्येकाने युक्तिपूर्वक अशांतता मुक्ति प्राप्ति करिता यत्न करावे, प्रयत्न नक्कीच शांतते कडेच पोहचतील.
हं..... आता मला ही कळलय...
हे लिहिल्यावर, अंतर्मनातले विचार मना बाहेर काढून टाकल्या नंतर काय असते.......
.......शांतता
डाॅ. तेजस लोखंडे
॥ स्वास्थ्यरंग ॥
drtejus.lokhande@gmail.com
अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद - डॉ. तेजस लोखंडे.
अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद.
दिवाळी म्हटलं की आठवतं ते अभ्यंग स्नान आणि मग हळूच पाय वळू लागतात ते मोती साबण घ्यायला. पण खरंच सांगू का, अभ्यंग स्नान म्हणजे फासला साबण आणि झाला अभ्यंग असं खरंच नाही. अभ्यंग स्नान ही एक शास्त्रशुद्ध संकल्पना आयुर्वेदाने कित्येक हजार वर्षांपूर्वी ग्रंथात मांडून दिली आहे.
अभ्यंग ह्याचा साधा सोप्पा अर्थ सांगायचा झाला तर नित्य नियमाने सर्वांगाला तेल लावून स्नेहन (मालिश) करून त्वचेमध्ये तेल जिरवणे.
*दिवाळी अभ्यंग स्नान* :
दिवाळी हा शरद ऋतू मध्ये येणारा सण. ह्या ऋतू मध्ये बाहेरील हवामान हे उष्ण आणि रुक्ष झाल्याने शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप ( वाढणे) होतो. उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत मुत्राचे प्रमाण कमी होऊन शरीरातील क्लेद (मल भाग) हा मूत्र मार्गाने कमी आणि स्वेद (घामातून) त्वचामार्गाने अधिक बाहेर पडतो. आयुर्वेदात त्वचा हे वाताचे स्थान सांगितले असून, स्वेदवह स्त्रोतसाच्या अधिक कर्मशीलते मुळे आणि वातावरण कोरडे झाल्याने त्वचा ही कोरडी पडायला लागते. त्यामुळे ह्या काळात अभ्यंग म्हणजेच सर्वांगाला तेल चोळून त्वचेचा स्निग्धपणा टिकवण्यासाठी मदत होते. तेलाच्या स्निग्ध गुणामुळे हे कार्य सिद्धीस जाते.
*अभ्यंग विधी आणि कार्य :*
आपल्या प्रकृती अनुसार वैद्यकीय सल्याने योग्य तेल निवडून ते साधारण कोमट करून सकाळी प्रातः विधी पार पाडून सर्वांगाला तेल लावून जिरवावे. तळवे, पाय, कंबर, पोट, छाती, हाथ, मान, चेहरा, मस्तक ह्या सगळ्या स्थांनाना कोमट तेलाने खालून वर अश्या एकाच दिशेने हाथ फिरवत तेल जिरावावे. हे करत असताना आपल्या परिसरात हवा वाहत नसेल (पंखा, एसी चालू नसावा) ह्याची खबरदारी घावी.
कोमट तेलाने अभ्यंग केल्याने शरीरातील त्वचेच्या आधारे राहणारा वात दोष ह्याचे शमन होते, त्वचेखाली असलेल्या स्वेद नलिका प्रसारण पावून मोकळ्या होत शरीरातील क्लेद (मल भाग) बाहेर यायला सहज मदत होते.
एवढे करून झाल्यावर साधारण अर्धा तास थांबून मग पुढील प्रक्रियेकडे वळावे.
*उद्वर्तन / उटणे :*
उद्वर्तन म्हणजेच सुगंधी द्रव्यांच्या चूर्णांनी शरीराला घर्षण करणे. या मध्ये त्रिफळा, सारिवा, नागरमोथा आदी द्रव्यांचा वापर केला जातो. तेलाभ्यंगामुळे शरीरातून बाहेर पडलेल्या क्लेदाला घर्षण म्हणजेच उद्वर्तन करून ह्या चूर्णाच्या सहायाने घासून मोकळे करायला मदत होते. शिवाय त्वचेखाली साचलेला मेद (अनावश्यक चरबी) ही कमी व्हायला मदत होते.
*उद्वर्तन / उटणे वापरण्याचा विधी :*
बाजारातून उटणे विकत न घेता आपल्या आयुर्वेदीय डॉक्टरांकडून उटणे चूर्ण बनवून घेणे.
त्वचा अधिक कोरडी असलेले / लहान मुलांसाठी - उटण्यामध्ये खोबरेल तेल किंवा दूध मिश्र करावे.
तेलकट त्वचा असलेल्यांनी त्या चूर्णामध्ये पाणी / नारळाचे पाणी टाकून वापरावे.
तेलाभ्यंग करून अर्ध्या तासाने हे
उद्वर्तन / उटणे चूर्ण आपापल्या त्वचेनुसार योग्य द्रवातून सर्वांगाला घासावे. नंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी. आंघोळ करताना साबणाचा उपयोग मात्र टाळावा.
*अभ्यंग कालावधी :*
आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे रोज अभ्यंग करावे आणि शक्य नसल्यास निदान आठवड्यातून ३ - ४ वेळेस तरी किमान करावे. सकाळी प्रातः विधी संपवून अथवा रात्री झोपण्यापूर्वी करावे.
*अभ्यांगाचे प्रकार आणि फायदे :*
१. शिरोभ्यंग - मस्तिष्क भागाला तेल लावणे. ह्या मुळे डोकं शांत होते, ताण तणावापासून आराम मिळतो, शांत झोप लागते, मन एकाग्र होण्यास मदत होते.
२. कर्ण पूरण - करंगळीला कोमट तेलामध्ये बुडवून दोन्ही कानामध्ये तेल लावणे. सोबत दोन्ही कानाच्या पाळीला तेल चोळणे. कान हे ही आयुर्वेदामध्ये वाताचे स्थान सांगितले आहे. शिवाय कर्ण इंद्रिय सक्षम राहण्यास मदत होते. शांत झोप लागते.
३. नाभी पूरण - नाभी म्हणजेच बेंबी मध्ये मावेल एवढे कोमट तेल सोडून मग तेच तेल पोट आणि ओटी पोटावर हलक्या हाताने चोळून जीरवावे. पोट आणि आसमंतातील अवयवांचे त्रास कमी होण्यास मदत होते, अजीर्ण, गॅस होणे, शौचास साफ न होणे ह्या तक्रारींवर हमखास चांगला परिणाम दिसून येतो.
४. पादाभ्यंग - दोन्ही पायांच्या तळव्यांना हाताने किंवा काश्याच्या वाटीने घासून तेल चोळून लावावे. ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, दृष्टीला बल प्रदान होते, ताण तणाव कमी होतो, शरीरातील कोरडेपणा नाहीसा होण्यास मदत होते, झोप शांत लागते.
५. सर्वांग अभ्यंग - पूर्ण शरीराला तेलाने अभ्यंग / स्नेहन करावे. वात दोषाचे शमन होते, त्वचा टवटवीत दिसते, प्रसन्न वाटते, त्वचा ही स्निग्ध आणि कोमल वाटू लागते.
*अभ्यंग तेल नियमित वापरण्याचे फायदे -*
१. त्वचेचा कोरडपणा नष्ट होतो.
२. त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होण्याकरिता उपयोगी.
३. त्वचा तेजस्वी आणि तरुण दिसते.
४.रक्त संवहन सुधारते.
५. वात दोषाचे शमन होऊन पुढे होणारे वात दोषामुळे रोग सहज टाळता येऊ शकतात.
६. सहज शांत झोप लागते, शरीर आणि मन ताण तणावातून मुक्त होते.
*उद्वर्तन / उटणे नियमित वापरण्याचे फायदे -*
१. त्वचा कोमल बनते.
२. त्वचेला निखार येतो.
३. त्वचेचा वर्ण उजळतो.
४. त्वचेवरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.
५. चेहरा तेजस्वी, प्रसन्ना दिसतो.
६. सुगंधी द्रव्यांमुळे मन प्रसन्न राहते.
७. शरीरातील अनावश्यक मेद (चरबी / वजन) कमी होण्यास मदत होते.
नियमित अभ्यंग स्नान आणि उद्वर्तन / उटणे वापरल्याने प्रत्येकाला तरुण राहणे, ताण तणावमुक्त राहणे आणि प्रसन्न राहणे सहज शक्य आहे. ह्या उपचार पद्धतीला किंवा आयुर्वेदात वर्णित ह्या दिनचर्येच्या उपक्रमांना आपलेसे करून घेतले तर निश्चितच आरोग्य रक्षण हा मंत्र दूर नव्हे. हेच उपचार आपण विविध केंद्रांमध्ये भरमसाठ खर्च करून घेण्यापेक्षा हा आपणच घरी करून आपलं आरोग्य ही निरोगी आणि प्रसन्न ठेवण्यास सहाय्य करू शकतो.
सर्वांना दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा.
डॉ. तेजस लोखंडे
|| आरोग्यं || - आयुर्वेद व पंचकर्म.
9773267001.
धुक्यात हरवलेला हरिशचंद्र गड - डॉ. नरेंद्र कदम.
धुक्यात हरवलेला हरिशचंद्र गड - डॉ. नरेंद्र कदम.
आषाढ आणि धो-धो पाऊस हे अतुट नाते. इंग्रजी कालगणनेनुसार हा साधारणत: जुलैचा महिना. २५ जुलै २००५ च्या आठवणी अजून लोकांच्या मनातून पूर्णपणे पुसल्या गेल्या नाहीत, या वर्षीही २००५ची काहीशी आठवण या पावसाने मुंबईकरांना करून दिली होती. खरंतर मुंबईकरांसाठी पावसाचे हे दिवस म्हणजे निरनिराळे ट्रेक आयोजित करणे आणि वर्षभरासाठी निसर्गाचा सहवास मनाच्या कोपऱ्यात भरभरून साठवून ठेवणे.
अशाच अपेक्षेने चावंडची ट्रेक केली होती पण हायरे दैवा! पावसाने अशी काही ओढ दिली की अक्षरशः रणरणत्या उन्हात हा पावसाळी ट्रेक पार पडला. कमीतकमी २२ जुलैला होणाऱ्या हरिश्चंद्राच्या ट्रेकला अशी परिस्थिती उद्भवू नये ही मनोमन भावना प्रत्येक जण मनोमनी व्यक्त करत होता.
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडावर अनुभवण्याचा अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्रातील ऊंच शिखरातील एक, तारामती शिखर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, आपल्या प्राचीन कलाविष्काराची ओळख करून देणारी पुष्करणी, गडावर निवास करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनेक गुफा, लेणी, ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीसाठी वाघावर बसून जाणाऱ्या चांगदेवांनी १४००० वर्ष तपस्या केलेली गुफा, चार युगांचे प्रतिक असलेल्या चार खांबांखाली असलेली केदारेश्वराची पिंडी, या खांबांशी जोडली असलेली एक आख्यायिका अशी की, प्रत्येक खांब हा एका युगाचे प्रतिक आहे आणि एक खांब हा प्रत्येक युगांती भंग पावतो म्हणून सध्या चालू कलीयुगाचे प्रतीक म्हणून एकाच सुस्थितीत असलेल्या खांबावर तोललेली केदारेश्वराची गुहा, आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आपल्या अनोख्या रौद्र सौंदर्याने वेड लावेल असा कोकणकडा आणि भाग्यवंताला दर्शन होईल असे इंद्रवज्र..
विविध निसर्ग सौंदर्याने नटलेला *अग्निपुराण आणि मत्स्यपुराणात* उल्लेख असलेला, १२व्या शतकापासून यादव राजांची निर्मिती असलेला आणि मुघलांच्या व मराठयांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व असलेला हा गड म्हणूनच ट्रेकर्सच्या यादीत खुप वरचे स्थान प्राप्त करून आहे.
२२ जुलैला गडभेटतर्फे हरिश्चंद्राच्या भेटीला जायला मिळणार म्हणून प्रत्येकाच्या मनात खुप उत्साह होता. वयोमानाप्रमाणे रात्री जागरण आणि दुसऱ्या दिवशी ट्रेक जमेल याची खात्री नव्हती म्हणून आदल्या रात्रीच पाचनईच्या मुक्कामी पोहोचण्याचा विचार करून गडाच्या पायथ्याला पोहोचलो. रात्रीच्या मिट्ट काळोखात गडाच्या विशालतेची जाणीव करून देणारा धबधब्यांचा आवाज आणि मधूनच चंद्राच्या किरणांनी उजाळून उठणारे गडाचे कडे रात्रीच मनात रुंजी घालू लागले होते. सकाळी बाकीचे साथीदार लवकरच येतील आणि गडाची चढाई चालू होईल अशा विचाराने डोळ्याला डोळा लागणे कठीणच होते, त्यात रात्रभर बाहेर तुफान पावसाच्या थैमानाचा आवाज चालू होता. सकाळी उजेड पडण्यापूर्वीच सकाळची कामे आटोपून आडोशाला उभे राहून येणाऱ्या बसची वाट पहात गडाच्या दर्शनाची आराधना करत होतो. नुकतेच कुठे फटफटू लागले होते, उजेडाची तिरीप गडावर पडायला लागली होती आणि गडाचे विशाल रूप नजरेसमोर येऊ लागले. गगनाला गवसणी घालतील असे ऊंच बेलाग कडे त्यातून खाली पडणारे आक्राळ विक्राळ धबधबे, गडाच्या विशालतेची जाणीव करून देत होते. रात्रीपासूनच मी म्हणणारा पाऊस आणि चारदोन फुटांवरचे पण दिसू न देणारे धुके मनाचा थरकाप उडवून देत होते. सहसा वेळ न चुकवणारे आमचे साथी चक्क दोन अडीच तास उशिरा पोहोचले. मनात एक शंकेची पाल चुकचुकायला लागली. निसर्गाच्या या रौद्रावताराचा संकेत मानून निमूटपणे जवळ असलेल्या भंडारदरा धरणाला भेट देऊन शांतपणे घरी जाण्याचा शहाणपणा करावा असं ही वाटू लागलं होत, पण बाकीच्यांच्या समोर हे बोलून आपला भ्याडपणा सिद्ध करायची हिम्मत झाली नाही.
आधीच झालेला उशीर आणि समोरचा निसर्गाचा अवतार लक्षात घेऊन कोणीही न सांगता प्रत्येकाने कमीतकमी वेळेत आपली तयारी करून निसर्गाच्या कुशीत शिरायची सिद्धता केली. आलेल्या सगळ्यांची औपचारिक ओळख करून ट्रेक सुरु झाला. बऱ्याच जणांनी हरिश्चंद्राला आधी भेट दिली होती परंतु या निसर्गाच्या चमत्काराची साद आज पुन्हा त्यांना गडाकडे घेऊन आली होती. ट्रेक सुरु होताच पावसाची एक जोरदार सर सगळ्यांना सलामी देऊन गेली. पावसापासून बचावाची थातुर मातुर साधने घेऊन आलेल्यांची धावपळ सुरु झाली आणि त्यांनी जी मिळतील ती साधने घेऊन आपला बचाव मजबूत करावयाची तजवीज केली. पण कोणाला माहीत होत की आपला हा बचाव आज अगदीच तकलादू ठरणार आहे.
पावसाचा मारा अंगावर झेलत शेवटी एकदा सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणून श्रीगणेशा केला आणि महादेवाचं नामस्मरण करून जय भवानी जय शिवाजीची डरकाळी फोडून निसर्गाचा सामना सुरु केला. प्रत्येकजण जणू निसर्गाला आव्हान देऊन गड सर करायला सिद्ध झाला. मजल दर मजल करीत पावसाने ओलेचिंब भिजून पहिला पडाव पार झाला. खरी लढाई आता सुरु होणार होती. जसं जसं गडावर पुढे सरकत होतो तसं-तसं धुके दाट होत होतं. पण नशीब बलवत्तर होत, धुक्याच्या जोडीला बेफाम वारा घोंघावत होता. क्षणात वारा धुकं हलवून टाकत होता त्यामुळे पुढची मार्गक्रमणा शक्य होत होती. दगडाच्या चढणीपाशी आल्यानंतर लक्षात आले की सतत कोसळणाऱ्या पावसाने शेवाळाचा थर दगडांवरती तयार झाला आहे आणि त्यावर पाऊल टिकवणं मोठ्या जिकिरीचं काम आहे. हे कमी म्हणून सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पावसाची एक धुमशान सर आली. शरीराच्या उघड्या भागावर लक्ष-लक्ष टोचणाऱ्या सुयांच्या भावनांनी पावसाचा थेंब शरीराचा वेध घेत होता. वाऱ्याच्या झोतासमोर उभे राहणे ही एक मोठी कसरत होती. काही क्षणात साऱ्याच्या हृदयाचा थरकाप उडवून पावसाची सर शांत झाली. वाऱ्याच्या झोतासमोर स्थिरपणे उभे रहाणे अजूनही शक्य होत नव्हते म्हणून काही क्षणांसाठी खाली बसणे सोयीस्कर असे समजून सगळ्यांनी आपले बस्तान मांडले. वाऱ्याचा वेग कमी झाल्यावरच पुढची मार्गक्रमणा सुरु झाली. पहिला चढ संपून कातळाच्या बाजूने जाणारा समतल रस्ता डोंगराला वळसा घालताना दिसत होता. जस-जस वळणाच्या जवळ जाऊ लागलो तसा वरून पडणाऱ्या धबधब्याचा आवाज कानी पडू लागला. माणसाचं मन किती वेड असतं नाही? एवढ्या प्रचंड पावसात गडाची चढाई केल्यानंतरही धबधबा दिसल्या बरोवर सगळेच वरून पडणाऱ्या पाण्याखाली भिजायला धावत सुटले. साधारण दीडेकशे फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्यात मनसोक्त बागडून पुढच्या मार्गाक्रमणेला सुरुवात झाली. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने वरून येणारे सारे ओघळ दुथडी भरून वाहात होते, अलीकडच्या डोंगरावरून पलीकडच्या डोंगरावर जाण्यासाठी असाच एक ओढा पार करण आवश्यक होत. पाण्याच्या या प्रवाहाला पार करणे दिसत होत तेवढ सोपे नव्हते याची जाणीव पाण्यात पाऊल टाकल्या बरोबर लगेच झाली. ट्रेकर्सकडे या साऱ्या प्रश्नांची उत्तरे तयारच असतात बहुतेक, या ओढ्याला ओलांडण्यासाठी सगळ्यांनी मानवी साखळी करून वहात्या पाण्याला शरण करून घेतले. आता खर आम्ही गडाच्या डोंगराच्या चढणीला सुरुवात केली, छोट्याशा पायवाटेने पुढचा चढ चढून जायचा होता. पायाखाली मातीचा रस्ता आणि त्या रस्त्यातून वरून खाली आपला मार्ग काढणारे पाणी आणि खालून वर मार्ग काढणारे आम्ही, जोरदार जुगलबंदी चालू झाली. चिखलामुळे निसरडा झालेला रस्ता त्यात मध्ये मध्ये छोटेमोठे दगड, सटासट आम्हाला खाली पाडायचा प्रयत्न करीत होते. या साऱ्या समस्यांवर मात करत करत, शेवटी एकदाचे आम्ही गडावर पोहोचलो.
निसर्गाच्या ज्या चमत्काराला नजरेत सामाऊन घेण्याच्या अट्टाहासाने चढाई करून आलेले सारे जीव क्षणभर विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ झाले. चिऊकाऊचा छोटासा घास तोंडात घेऊन घोटभर पाण्याने घसा ओला करून तारामती शिखराच्या पायथ्यापासून हरिश्चंद्रेश्वराच्या देवळाजवळ पोहोचले. निसर्ग पुन्हा एकदा आमची परीक्षा घ्यायला सज्ज झाला. आजूबाजूला सगळे धुक्याचे साम्राज्य वाढायला लागले, अगदी हाकेच्या अंतरावरचेही दिसेनासे झाले. ज्यांना गडाची माहिती होते ते हरिश्चंद्रेश्वराच्या जवळच उभे राहून गडाची आणि मंदिराची माहिती सांगत होते पण धुक्यामुळे पाच फुटावरचे मंदिरही मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्याशिवाय नजरेत आले नव्हते. थोडा वेळ थांबून धुके विरण्याची वाट पहात हरिश्चंद्रेश्वराची यथासांग पूजा करून झाली, जवळ असलेल्या गुफेतल्या गणेशाचीही पूजा आणि आरती करून कोकणकड्याची वाट दाखवण्याची मनधरणी करून झाली. धुके विराण्याऐवजी अजूनच दाट होत चालले होते. घड्याळाचा काटाही परतीची वेळ निघून गेली आहे हे निक्षून सांगत होता. परतीच्या मार्गाला लागण्याचा मनाचा अजून निर्धार होत नव्हता, मनात अंधुकशी आशा होती, केलेल्या प्रार्थनेला यश मिळेल आणि कोकणकाड्याची वाट नजरेस पडेल असे वाटत होते.
या अखंड विश्वात मानव प्राणी निसर्गापुढे किती क:पदार्थ आहे याची अनुभूती आम्ही अनुभवत होतो, निसर्गाला आव्हान देण हे मानवाच्या आवाक्यातली गोष्ट नाही हे प्रत्येकजण जाणून होता आणि म्हणूनच ट्रेकर्सच्या अलिखित नियमांनुसार निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काही करणे म्हणजे आत्मघात करणे हे स्मरून धुक्यात हरवलेल्या या हरिश्चंद्र गडाला पुन्हा भेट देण्याचा निर्णय घेवून परतीच्या प्रवासाची वाट धरली. गडाच्या या ऐतिहासिक वारशांचा अनुभव घ्यायचा म्हणून मोठ्या आशेने आलेली मंडळी नाराजीने पुन्हा एकदा गडाची चढाई करण्याच्या ठाम निश्चयाने आपली पावले ओढत गडउतार होऊ लागली.
खरच निसर्गापुढे माणूस किती क्षुद्र आहे. आपल्या अफाट बुद्धिमत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या आणि विज्ञानाच्या साथीने निसर्गावर सतत अत्याचार करणाऱ्या मानवाला निसर्गावर कधीच विजय मिळवता येणार नाही हे त्रिकालातीत सत्य आहे. क्षणभरात होत्याच नव्हत करण्याची ताकत असलेल्या आणि त्याची क्षमता मान्य असणाऱ्या आमच्यासारख्या पामरांना आपल्या निरनिराळ्या रंगांच्या उधळणीने आनंदी करणाऱ्या निसर्गराजाला त्रिवार प्रणाम.
डॉ. नरेंद्र कदम.
9869061889
drnbkadam@gmail.com