.
शांतता....
-(डाॅ. तेजस लोखंडे)
काय होणार ?
कसे होणार... ?
अशा प्रश्नांनी गोंधळलेले सर्वजण..
प्रसुतिगृहा बाहेर एकच शांत व गंभीर वातावरणात स्तब्ध होते. एवढ्यात एका बाळाच्या रडण्याचा टॅह्यॅ ने शांतता भंग पावते, सारे आनंदात दंग होतात.
रडणारे बाळ ही आता.... आई च्या गर्भातले शांततेचे वातावरण सोडून या अशांत ग्रहावर अवतरलेले असते.ह्या शांततेचा विचार जरी केला तरी आपण स्वतः किती शांत.. अन् संथ होऊ लागतो.
निशब्द शांतता -
अनुभवली आहे का कधी तुम्ही ??
पावसाळ्यात कोसळणारे..,
कल्लोळ करणारे..,
जणू 'मी आलोय.. मी आलोय...' असे ओरडून सांगणारे झरे...
उन्हाळ्यात किती शांत पहुड़तात ! भयान अंधारात चालताना, बाहेर चा अंधार ही कमी वाटावा इतके भय उत्पन्न करते ती ही शांतताच...
किल्ले - डोंगरांवर वार्याच्या स्पर्शात, नभाच्या रूपात, मातीच्या गंधात, कुसुमांच्या रसात, प्राणी-पक्ष्यांच्या शब्दात.... काय शांतता लाभते हे स्वतः अनुभवल्या शिवाय कळणे नाही...
सर्वश्रुत आहेचच की ,
'गर्दीत आपण एकटे असण्याचा भास आणि एकटे असताना ही गर्दीत उभा रहिल्याचा भास' हे काही नवीन नाही... पण का होता असं ??
आंब्याच्या झाडाखाली गारेगार शांतता तर गुलाबी थंडीतली शेकोटीची उबदार शांतता...
पॅरासेलिंग प्रमाणे भासनारा सुगरणीचा खोपा...
काय अजब आहे ना निसर्ग !
खाली पाण्याने भरलेली विहीर, विहिरीवर वाकलेली झाडाची नाजूक फांदी, फांदीला लोंबकळणारा खोपा अन् खोप्यामधे सुगरणीची पिल्ले.. किती आत्मविश्वास असावा ह्यां पिल्लांना.. किती शांतता वाटत असेल त्या लेकरांना जेव्हा त्यांची माय परतत असेल त्यांचे कडे.
घाबरलेल्या मुलाला आई ने छातीशी कवटाळावं...,
नवर्याने बायकोच्या केसात मोगरा माळावा...,
भरपूर अभ्यास झाल्यावर मुलांनी धाव घ्यावी खेळायला...,
मांडी वर निजलेल्या आपल्या प्रियकरला प्रेमाने कुरवाळावं....,
उपाश्याला दोन घास भरवावे,
तहानलेल्याला दोन घोट पाजावे,
ऐकणार्याला ऐकवावे...
बघणार्यांना दाखवावे....
शिकणार्याला शिकवावे...
क्षमा मागणार्याला क्षमा द्यावी,
प्रेमाला आसुसलेल्याला प्रीती द्यावी...
एकदा उनाड होऊन बेफाम वागून बघावं..
आपल्या माणसावर एकदा रागावून पहावं..
हक्काच्या ताई कडून एक शर्ट मागून घ्यावा...
लाडाने त्याच ताईला साडीची ओवाळणी द्यावी...
रात्र पूर्ण मित्रांसोबत जागून काढावी...
रंगांना.. रंगांसारखंच एकदा पाहुन बघावं...
एकदा का होईना पण.. काळ्या ला पांढरा अन् पांढर्याला काळा बोलून तर पहावं....
बाळाला आजोबाने हात धरुन फिरायला नेणं..
बाळाला निजताना आजी ने मायने थोपटावं... आणि....
आणि ह्या सार्यांना विचारावे "शांतता" कशास म्हणावे !
घरात प्रेत पडले तर माहोल शांत आणि महापुरुषांच्या समाधिस्थानात ही आसमंत...
शांतच...
एक व्यक्ति म्हणून प्रत्येकाने युक्तिपूर्वक अशांतता मुक्ति प्राप्ति करिता यत्न करावे, प्रयत्न नक्कीच शांतते कडेच पोहचतील.
हं..... आता मला ही कळलय...
हे लिहिल्यावर, अंतर्मनातले विचार मना बाहेर काढून टाकल्या नंतर काय असते.......
.......शांतता
डाॅ. तेजस लोखंडे
॥ स्वास्थ्यरंग ॥
drtejus.lokhande@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा