स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

पंढरी भटक्यांची... वारी हरिश्चंद्रगडाची.- Dr. Tejas Lokhande

 
पंढरी भटक्यांची...वारी हरिश्चंद्रगडाची.
          - डाॅ. तेजस लोखंडे
नैसर्गिक  कलाकुसरीचे भव्यदिव्य रूप, मंगलगंगेचा अमृततुल्य जलरस, पश्चिम वार्‍याचा रोमांचक  स्पर्श, पौराणिकतेचा  मंद गंध,  अध्यात्माचा आत्मिक गुंजारव , विविधरंगी वने, पाने, फुले, पक्षी, प्राण्यांचा पायरव. अभेद्य कडेकपार जणू शिवशक्तीचा स्वयंभू साक्षात्कार ! 
4600 फूट उंच ज्याचा अभिमान,
अद्वितीय कडा ज्याची शान,
जलाशयाचा साठा बेभान, 
असा हरिश्चंद्रगड महान.!!
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हा हरिश्चंद्रगड बर्‍याचदा मनाला भुरळ घालत होता. मित्रांकडून ऐकलेले कौतुक सोहळे आपल्याला देखील अनुभवायला मिळेल की नाही याची सतत हुरहुर लागत होती पण म्हणतात ना कि इच्छाशक्ती हीच सर्वश्रेष्ठ. बर्‍याच वर्षांची सुप्त इच्छेची योगपूर्ती इतक्या लवकर  होईल यावर विश्वास बसत नाही. तसा आमचाही अचानकच प्लॅन झाला,  रविवार च्या सुट्टीला लागून आलेल्या बौद्ध पौर्णिमेच्या बुट्टीमुळे हाताशी दोन दिवस मिळणार होते.  सोबती म्हणून मित्रपरिवार गोळा करणे म्हणजेच वास्तविक गिर्यारोहण करण्यापेक्षाही अवघड कार्य ह्या ही वेळेस पार पाडत फायनल ला माझ्यासह तीन जण पोहचले. रात्रीच प्रवास सुरू केला आणि पनवेल - मुरबाड - माळशेज - खुबी फाटा आणि पुढे डावीकडच्या पिंपळगाव जोग धरणाच्या पाठबंधरावरून खिरेश्वर गावाच्या पायथ्याशी पोहचलो. वेळ न दवडता लगेच आरोहणाला सुरूवात केली.  गणपती बाप्पा मोरया... हर हर महादेव... या गजरात गडावर जाणारी रुळलेली पायवाट धरली. पहाटेची वेळ, निरव शांतता, गार वारा आणि गर्द झाडीतूनही आम्हाला न्याहाळणारा पौर्णिमेचा चंद्र मात्र आसमंत प्रकाशमान करू पाहत होता.  आम्ही चार वाटसरू आमच्या मार्गदर्शक टाॅर्चच्या प्रकाशाधारे चालत होतो. दोन - तीन विसावे घेत दोन तासात पहिला टप्पा गाठला तो तोलार खिंडीचा आणि स्वतःचेच तोंड हे रसरशीत अशा काकडीने गोड केले.
तोलार खिंडीतील व्याघ्रशिल्पाचे दर्शन घेऊन डावीकडची चढणारी पायवाट धरली आणि थोड्याच अंतरावर असलेल्या राॅकपॅच नजीक पोहचलो. रेलिंग ने सुरक्षित केलेली वाट चढलो तेव्हा निसर्गच  जणू काही हाक देत होता.... 'ऐ... पलट.. ! '. आम्ही पलटून पाहिले आणि भारावून टाकणारे लॅन्डस्केप हे नजरेतून थेट मेंदूपर्यंत आपोआपच चित्रवत उतरले गेलं. एव्हाना सूर्य पूर्वेकडील डोंगररांगेतून आपलं एकेक अंग बाहेर काढत होता. दरीतील खिरेश्वर गाव आणि धरणाचा बंधारा दूरपर्यंत दिसत होता. माथ्यावरून पांढरे शुभ्र ढग प्रवास करत आपल्या गावी बरसण्यासाठी निघाले होते. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवून पुढे निघालो अन् तिथेच एक ताक, लिंबू पाणी विकणाऱ्या गावक-याची झोपडी लागली. इथूनच गडावर जाण्यासाठी दोन वाटा फुटतात. एक सरळ जी एकूण सात टेकड्यांच्या चढ उतार पार करत दमछाक करवणारी तर दुसरी ही डावीकडे वळून जंगलवाटेतून रमतगमत जाणारी. जंगलामध्ये उन्हापासून संरक्षण देणार्‍या झाडांची वाट आम्ही धरली, सुरुवातीचा काही चढ चढून निसर्गाच्या एका रंगबिरंगी महालात आमचे आगमन झाले.  समोर असलेल्या टेकडीवर लाल, केशरी, हिरवी,  पिवळी,  मातकट,  पांढ-या पानांनी नटलेली धरणी आपलं रुप अधिकच खुलवत होती. वरून वाहणारे ढग आणि वावरणारे धुके आसमंतात चैतन्य निर्माण करत होते.
पाय हलवत नसताना देखील तेथून निघावे लागले. साधारण अर्धा तास पुढे चालून आल्यावर पाचनई गावातून येणारी वाट आमच्या वाटेला मिळाली.
थोडेच पुढे गेल्यावर धुक्याच्या आड लपलेले हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराचा काळा पाषाण आणि भगवा ध्वज हा तोर्यात उभा दिसत होता. आजूबाजूच्या परिसरातील पुष्करणी, छोटी छोटी मंदिरं आणि दूरवरून साद घालणारी गणेश गुहा नजरेस पडली. वेळ सकाळची साधारण सव्वा नऊ ची आणि आम्ही आलो होतो ते हरिश्चंद्रगडाच्या एका विशेष सोहळ्याचे साक्षीदार व्हायला.  सोहळा "इंद्रवज्र" दर्शनाचा आणि म्हणूनच हरिश्चंद्रेश्वराला बाहेरून नमस्कार केला आणि वाट पकडली ती थेट कोकणकड्याची. अर्ध्या तासात आम्ही कड्याजवळ  असलेल्या सावळाराम आणि भास्कर च्या घरी पोहचलो. हे दोघे म्हणजे कोकणकड्याचे मालकच. आम्ही आमच्या बॅगा टाकल्या आणि सुसाट धावलो ते ज्याचे कौतुकाचे बोल ऐकून मन बर्‍याचदा बेचैन करणार्‍या कोकणकड्याकडे.
कड्याकडे  धावत सुटलो. समोरून येणाऱ्या वार्‍याने पूर्ण ताकदीने  आम्हाला अडवले आणि कानात एक जोराची किंकाळी ऐकू आली ... 'थांबा'. थबकलेल्या पावलांनी तेथेच थांबलो आणि कड्या चे याची देही याची डोळा प्रत्यक्ष दर्शन घडले. डाव्या उजव्या बाजूला अथांग पसरलेला कडा आणि दरीतील कडेकपारीची खोली अनुभवली.  कड्याच्या माथ्यावरून लांब, जाड, जटास्वरुप भावणा-या कातळकायेला साष्टांग लोटांगण घातले आणि तिच्या रौद्रभिषक रूपाचे सौंदर्य मनात भरू लागले. जितकं ऐकल होतं त्याहून कितीतरी पटीने अधिक तेजस्वी होता तो शिवजटास्वरूप  कोकणकडा जो भौगोलिक आणि रचनात्मक दृष्टिकोणातून वैशिष्ट्पूर्ण ठरलाय. याचा आकार इंग्रजी अक्षर सी सम असून तो अंतर्वक्र आहे  म्हणूनच पावसाळ्यापूर्वी पश्चिमेकडचे ढग या खळगीत अडकतात. पूर्वेकडून जसा जसा सूर्य वर येऊ लागतो तशी तशी आपली सावली  ढगांवर पडते व तिच्या भोवती वर्तुळाकार इंद्रधनू तयार होते ज्याला 'इंद्रवज्र' असे म्हणतात. ज्या सोहळ्याची उत्कंठा होती तो क्षण अनुभवायला मिळणार होता. सार्‍यांचे लक्ष हे सूर्याकडे आणि दरीतील ढगांकडे होते. मात्र धुक्याच्या हजेरीत त्या दोघांची जुगलबंदीच अधिक काळ ताल धरत होती. याच जुगलबंदी च्या मैफिलीत परफेक्ट सूर लागावा आणि इंद्रवज्राचा साक्षात्कार व्हावा याकडेच सगळ्यांची नजर टपलेली. शेवटी बर्‍याच वेळाने तो क्षण आला आणि क्षणार्धात दर्शन देऊन तसाच निघून गेला.  दोन क्षणात दोनदा दर्शन घडले पण अगदी सेकंदासाठी.  या काळात जे पाहिले ते खरंच स्मृतीत राखून ठेवण्यासारखे होते. मेहनती चे चीज झाले त्यामुळे आनंद हा द्विगुणित झाला होता.
आनंदाच्या भरात आपण पोहे बनवायला लावले याचा पार विसर पडला होता. लगेच आम्ही सावळ्याच्या घरी गेलो तर त्याची आई सा-या भटक्यांची अन्नदात्री  आम्हाला म्हणाली, " बाळांनो आधी दोन घास खाऊन घ्या अन मग खुशाल हिंडा, गड काय कुठं जात न्हाय ..." माऊलीच्या आज्ञेचे पालन करत मनमुराद पोटपूजा केली आणि पुन्हा कड्यावर येऊन विसावलो ते विलोभनीय दृश्याचा मनसोक्त आनंद लुटाया. चालून क्षीण झालेल्या शरीराला आणि शीणलेल्या मनाला गरज होती ती क्षणभर विश्रांतीची. गोणपाट अंथरुन पाठ टेकली आणि दोन्ही पापण्यांनी एकमेकांना मिठी मारली. पावरनॅप होताच आजूबाजूचा भाग फिरुन झाला  मग निघालो ते थेट हरिश्चंद्रेश्वराचे दर्शन घ्यायला. अर्ध्या तासात मंदिर गाठले. मंदिराच्याच पाठीमागील भुयारी जलकुंभातल्या गार पाण्याने स्नान करून महादेवाचे दर्शन घ्यायला म्हणून  गाभाऱ्यात प्रवेश केला. मोगरा, चाफा, धोतरा अर्पण केले, धूप कापूर दाखवून आरती केली. प्रदक्षिणा घालत बाहेरच असलेल्या केशरी रंगात लेपलेल्या गणपती ची पूजा केली. हजारो वर्षांच्या या मंदिराच्या सौंदर्याला डोळ्यांच्या कॅमेरात कैद केले आणि पुन्हा एकदा निघालो  कोकणकड्याकडे !. कारण आता सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती. . भरभर  चालत पंधराव्या मिनीटाला कड्याजवळ आलो. सूर्यास्त दिसायची योग्य जागा म्हणजे कड्याचा पश्चिम अंग.  दिवसभर तापलेला सूर्य आता मात्र केशर लेऊन आपल्या घरी निघाला होता. ढगांचा निरोप घेत मावळतीचा सूर्य आम्हाला पण निरोप देत शहाण्या बाळासारखा आपल्या घरी गेला. आम्हीही शहाण्या बाळासारखे कड्याजवळ आलो. खळगीत  ढगांमुळे पांढरा थर दिसू लागला होता, हवा  गार होऊन गुलाबी थंडीचा माहोल तयार करीत होती. त्यातच मस्त चुलीवरचे गरमागरम जेवण करून कड्यावर पुन्हा येणे केले. ज्या कड्याबद्दल इतकी उत्सुकता लागली होती आज त्याच कड्याचे आम्ही रहिवासी झालो होतो.  रात्र आम्ही याच कड्याजवळ तंबूत काढली.
रात्री सुटलेल्या वार्‍याचा जोर वाढू लागला आणि थंडगार वातावरणात झोप कधी लागली ती कळली ही नाही. रौद्रभिषक रूपाच्या कड्याचे सौंदर्य जसं नेत्रदीपक होते तशीच त्या मातीमधली उब ही ममतेने  परिपूर्ण जाणवली आणि बहुधा पौर्णिमेचा चंद्र देखील त्या ढगांचं पांघरूण घेऊन सुस्त झाला.
सकाळी बरीच थंडी पडली होती. धुके साचले होते. निसर्गशक्ती च्या दवबिंदूंनी सारा आसमंत हा न्हाऊन निघाला होता. ह्यावेळीस मात्र कोकणकडा हा अगदी शांतस्वरूप, ध्यानस्थ प्रतीत होत होता. हा देखणा आनंद आमच्या शिदोरीत अधिकच भर घालून गेला.
आता मात्र परतीची वाट धरायची ह्या विचाराने पाय जड होऊ लागले होते. सगळे आवरून आमच्या माऊली कडे गेलो.  प्रेमाने वाढलेले पोहे आणि चहा फस्त करून माऊली चा निरोप घेतला. वाकून नमस्कार केला तेव्हा आमच्या दोघांचेही शब्द जड झाले होते. निघताना अगदी आपल्या माणसांकडे सांगावं तसं आई म्हणाली , ' काल दिलेल्या चाफ्याच्या फुलाचे झाड मिळाले तर पुढच्या बारीला घेऊन या, शेतात लावायचंय'. दोन दिवसाच्या सहवासाचा स्नेह हा एका चाफ्याच्या फूलाच्या गंधबंधनात दृढ झाला ह्याचा आनंद हा कोकणकड्याच्या विस्तारात न मावणारा होतो. मी ही हो म्हणालो आणि परतीच्या प्रवासाला जड अंतर्मनाने पण सुखद अनुभवांच्या क्षणांची शिदोरी घेऊन निघालो.
प्रवासानुभव - डाॅ. तेजस लोखंडे
॥ स्वास्थ्यरंग ॥ गडभेट
9773267001