स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

आरोग्यसंपन्न गुढीपाडवा / Aarogyasampanna Gudipadwa - Dr. Tejas Lokhande

आरोग्यसंपन्न पाडवा (Aarogyasampanna padwa) - डाॅ. तेजस लोखंडे

          पाडवा सण नववर्षारंभाचा, सण नव चैतन्याचा, सृष्टीत वसंत फुलण्याचा आणि म्हणूनच ह्या काळातीलऋतूला 'वसंत' असे संबोधले जाते.  संवत्सर वर्षात एकूण सहा ऋतू येतात. ( शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत ) दोन महिन्यांचा एक ऋतू आणि तीन ऋतूंचा एक अयन. शिशिर-वसंत-ग्रीष्म ह्या महिन्यात सूर्याची शक्ती ही उत्तरोत्तर बलवान होत जाते, यालाच 'उत्तरायण' असे म्हणतात. ह्याच काळाला 'आदानकाळ' असे ही संबोधले जाते.

          हेमंत-शिशिर महिन्यातील थंड वातावरणात शरीरात गोठलेल्या कफदोष, हा उत्तरायणातल्या सूर्याच्या प्रखर किरणांच्या तेजामुळे वितळून शरीरात कफदोष प्रकुपित होतो. ज्यामुळे या काळात बर्‍याच कफदोषापासून जन्माला येणारे रोग सहज डोके वर काढू पाहतात. कफदोषाच्या विलयनाने जठराग्नी ( शरिराची पाचनशक्ती) मंद होतो आणि मंदाग्नी हेच सार्‍या रोगांचे मूळ कारण आयुर्वेद शास्त्र सांगते.

          ज्या पद्धतीने वसंत ऋतूत निसर्गशक्ती ही नव्याने फुलू लागते, झाडांना नवी पालवी फुटते, त्याच पद्धतीने मानवी देहात सुद्धा वसंत फुलावा म्हणूनच आयुर्वेदाने पंचकर्माद्वारे ह्या काळात दुष्ट कफाचे शोधन करणार्‍या वमन कर्माचा शास्त्रादेश केलाय. आपल्या हिंदू संस्कृतीत सणांना स्वास्थ्याची जोड आहेच आणि म्हणूनच वसंतातल्या ह्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव वर्ष साग्रसंगीत पणे साजरा करतात. दाराला झेंडूचे तोरण बांधून, आंब्याच्या टहाळा लावून, दारात रांगोळी रेखाटून,  नवीन वस्त्र परिधान करून पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून मनोभावे नमस्कार केला जातो. ह्याला प्रसाद म्हणून कडूनिंबाची पाने-मोहर, धणे आणि गुळ यांचा विशेष योग तयार करण्याची पारंपारिक प्रथा आहे. यामध्ये गुळ हा चवीने गोड आणि गुणाने उष्ण असल्याने शरीरातील दुष्ट कफाचा नाश करून शरीरस्थ जठराग्नी सुस्थितीत राखायला मदत करतो. विलयन पावलेल्या दुष्ट कफामुळे शरीरात अनेक प्रकारच्या कृमींची उत्पत्ती होते. या स्थितीत कृमीनाशक, कफदोषशामक, रक्तशोधन करणार्‍या गुणांचा कडुनिंब वापरण्याचा शास्त्रादेश असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. धणे हे पित्तशामक, दाहशामक, शरीराला थंडावा देणारे आहे. एकंदरीतच हा संयोग नुसताच पाडव्यादिनी न घेता काही दिवस सेवन केला तर वसंतात कफदोषाच्या प्रकोपाने व येणाऱ्या ग्रीष्मात पित्तदोषाच्या संचयाने होणार्‍या रोगांची उत्पत्ती सहज टाळता येईल. दूरदृष्टी ठेवून केलाला  हा रोगप्रतिबंधक विचार हा आयुर्वेदाने मानवाला स्वास्थ्य रक्षणासाठी  दिलेले हे वरदानच आहे. स्वास्थस्य स्वास्थ रक्षणम् आतुरस्य व्याधीपरिमोक्षः म्हणजेच व्याधींची चिकित्सापेक्षा ते होऊ नये या साठी स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि त्याकरताच हे प्रतिकार शक्ती वाढवणारे योग शास्त्रकारांनी सुचवलेत.

          हिंदू सण साजरे करताना आयुर्वेद वर्णित ऋतूचर्यांचे पालन यथोचित पद्धतीने केल्यास आपले सण, आपली संस्कृती आणि आपली उद्याची पिढी ही आरोग्यसंपन्न होतील हा ठाम विश्वास वाटतो.

आरोग्यसंपन्न गुढी पाडव्याच्या आरोग्यदायी शुभेच्छा.

डाॅ.  तेजस लोखंडे
संस्थापक अध्यक्ष - ॥ स्वास्थ्यरंग ॥
अध्यक्ष - स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान
गिरगांवचा  पाडवा २०१७.
९७७३ २६ ७००१.