स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

॥ कलेच्या कलाने स्वास्थ्यरक्षण ॥

'आयुर्हित 2015 © - जीवनशैलीचे विकार' या विशेषांकात आलेला माझा प्रस्तुत लेख आपणाकरिता सादर करित आहे. काही निवडक मुद्दे इथे मांडले आहेत. तरी संपूर्ण लेख वाचण्याकरिता शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल.
आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित.... 

|| कलेच्या कलाने स्वास्थ्यरक्षण ||

-    वैद्य तेजस लोखंडे

 स्वस्ताई आणि महागाई हे जसे दोन मुद्दे जनसामान्यात चर्चेच्या बाबी झाल्यात त्याचप्रमाणे “स्वास्थ्य” आणि “आरोग्य” ह्या देखील चर्चेच्याच गोष्टी  झाल्या आहेत. स्वास्थ्य आणि आरोग्य हे लोकांना आता चांगलच कळून चुकलयं, पण म्हणतात ना- कळतय पण वळत नाही, तशीच ही गत आहे.

सदर लेखात स्वास्थ्याविषयी उहापोह करणार आहे.

समदोषः समाग्निश्च समधातूमलक्रिया |
प्रसन्नात्मेंद्रियमनः स्वस्थ इत्यभिधियते ||

आतापर्यंत स्वास्थ्याची ही व्याख्या सर्वांनाच माहित असेल किंबहुना पाठ ही झाली असेल पण त्यामधल्या सर्वांत महत्त्वाच्या अंगाकडे, म्हणजेच “प्रसन्नात्मेंद्रियमन” ह्या कडे लोकं सर्रास पाठ फिरवताना दिसतात आणि इथेच स्वास्थ्य स्वस्त न राहता महागड्या औषध-उपचारांकडे वळण घेऊ लागतं.

शरीर व इंद्रियांचा वापर सुयोग्य होण्याकरिता मनालाच पुढाकार घ्यावा लागतो. शरीरानं करावं आणि पंचेन्द्रियांपर्यंत पोहचावं याकरिता सतत मन झटत असतं. सद्याच्या काळात चालू असलेली धावपळ, विचारांचा सतत पपडणार्‍या पावसामुळे मनाचाच गोंधळ उडालेला दिसतो. मन हे रुपाने अणु असे असून ते एका वेळेस एक विशिष्ट काम करायला लागल्यामुळे मनावर पडणार्‍या ताणामुळॆ शरीर आणि आत्मा यांची प्रसन्नता नाहीशी होताना अनुभवाला येते.

एखाद्या गोष्टीचा सार भाग हा शुद्धच असतो म्हणूनच मनाच्या गुणाला “सत्त्व” असे म्हणतात. व किट्ट भाग म्हणजेच “रज” आणि अंधारमय प्रवृत्तीचे “तम” हे मनाचे दोष म्हणून ओळ्खले जाते.

सद्याचं जीवन म्हणजेच जिथं 'जीव वणवण फिरत राहतो' आणि जीवातच 'जीव' नसतो. ह्याचं प्रमुख कारण म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचा सर्रास केलेला स्वीकार. या संस्कृतीमध्ये पिशाच्च कृती भावाचे माप फार मोठे आहे. याच अवलंबानपायी आपल्या सात्त्विक गोष्टींचा र्‍हास होतोय आणि राजसिक आणि तामसिक गोष्टींचं प्रमाण झपाट्याने वाढू लागलयं.

आपल्याकडची संस्कृती ही वैचारिक संकल्पनेतून उदयास आली. आपली संस्कृती म्हणजेच आपले षडऋतु त्यांची ॠतुचर्या, दिनचर्या, शास्त्र, अध्यात्म, कर्मयोग, भक्तीयोग, विज्ञानयोग, चौसष्ट कला लाभलेली कलासंपदा, साजरे होणारे विविध सण, आहारशास्त्र इ.. सारं अगदी सात्त्विकतेने परिपूर्ण आणि सज्ज असे आहे. मग तो सण असो अथवा दिनचर्येतील एखादी क्रिया, त्यात साग्रसंगीतपणा असायचा, शास्त्र असायचे. त्यामुळेच तेथे सात्विकता  टिकून होती,त्यात सुदृढ आरोग्याचं रहस्य  दडलेलं होतं.

पूर्वी लोकं पहाटे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, आता उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्त सुरु होतो. स्त्रिया सकाळी सडासंमार्जन करताना केरसुणी वापरत, याच्याच उलट आता फूलझाडूने ही जागा घेतल्यापासून कंबरेतून खाली वाकण्याचा विसर गेली अनेक दशक पडलेला आहे. तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालतांना प्रातःकाळचा मिळणारा ऑक्सिजनचा आनंद आज कार्बन डायऑक्साईडने भरुन निघतोय. एवढचं काय तर बाह्य वातावरणातला कार्बन डायऑक्साईड कमी पडतोय की काय म्हणूनच आजची पिढी पूर्वीचे आरोग्यदायी असललेले लिंबू सरबत, ताज्या फळांचा रस, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, ताक आदी द्रव्यांना पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत कोल्ड्रिंग्सचा पर्याय निवडताना दिसतात. भोजन हे एक यज्ञकर्मच सांगितलयं.. खरचं काय योग्य वर्णन केलंय. प्रत्येक जेवणापूर्वी हस्त-पाद प्रक्षालन करुन पाटावर आसन ग्रहण करुन समोर आलेल्या अन्नाला नमस्कार करत, 'वदनी कवळ घेता' मंत्रोच्चाराने वातावरण शुद्धी करत, अन्नदेवतेस वंदन करुन भोजन ग्रहण केले जायचे. ह्या कृतीबद्दल किती सुंदर आणि सात्विक भावना होती. स्रियांनी सकाळी दारांसमोर रेखाटलेली रांगोळी ही घरामध्ये आरोग्य आणि लक्ष्मी यांचं स्वागत करायची. याउलट आजची स्री प्रगत झाली म्हणतात आणि लक्ष्मीची घेण्यास भेट घेण्यास स्वतःच घरा बाहेर पडू लागली. सारं ओझं वाहताना आपल्याच आरोग्याकडे दुर्लक्ष करु लागली आणि पूर्वीची अवगत असलेली कृतीशीलता आणि मनाचा मोकळेपणा हरवून बसली.

पूर्वीच्या काळी स्त्रिया घरकामे करताना, दळण करतानाची जात्यावरची गाणी गाताना, मंगळागौर साजरी करताना सार्‍या स्त्रिया एकत्र येवून भोंडला-बसफुगडी-पिंगा घालत मन रमवायची. यामधून मिळणारं शारिरीक व मानसिक स्वास्थ्य हे शरीर-इंद्रिय-मन यांची पुष्टी, आत्मा-शरीर—मन यांच्यात प्रसन्नता राखली जायची.

व्यक्ती शिक्षणाने वाढते आणि संस्कारांनी घडते. पण आज दुर्दैव असं की पाश्चात्य संस्कारांचा पगडा   आपल्या परंपरांना कोनाड्यात टाकू  पाहतोय.  पूर्वीच्या आपल्या पारंपारिक गोष्टींना सर्रास आऊटडेटेड ठरवून नव्याचा ताल धरण्याच्या प्रयत्नात नीती,  आणि मति ह्यांचा विभ्रंश होताना दिसतोय. आपल्या रुढी परंपरा ह्यांना पूरक पर्याय शोधणे कठीण असेल तर त्या आहेत तशा मान्य कराव्यात. अशिक्षित स्त्रियांना हरिपाठ, मनाचे श्लोक, अभंग, शेतकरी-कोळी-धनगर यासारखी विविध लोकगीते ही शालेय शिक्षण न घेता पाठ असायची. आज शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा शुभं करोति कल्याणम” चं कल्याण झालेलं दिसतंय असं उपहासाने म्हणावसं वाटतंय. तिथे “आरोग्य धनसंपदा”तरी  कशी अबाधित राहील.

आजच्या प्रगत जगात संगणक, मोबाईल यांच्या विविध उपक्रमात जीव गुरफटून जातो आणि स्वतःच्याच अस्तित्वापासून फूटत जातोय, मनापासून तूटत जातोय. स्वतःकडची असलेली संतुष्टता संपुष्टात आणली आहे.

हल्ली मनासारखं काहीच घडत नसल्याची खंत अनेकाच्या मनाला डंख मारत राहते. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अनावर होतात. होकारापेक्षा नकाराचा आकार मोठा होत विकारात विलीन होतो. ह्या विकाराच्या प्रतिकाराचा विचार होणं ही काळाची गरज आहे.

शरीर आणि इंद्रिय याच्यांत सांगड घालताना मनाची कसरत घडतेयं. विषय सरता सरता परिस्थिती तन झिजवत आहे अन मन रिझवणं दूर जात आहे. मनाला अंधाराच्या विळ्ख्यातून प्रकाशमय करायचं तर रंगाची संगत हवीच. रंगांचा संग म्हणजेच कलेचा व्यासंग !
कलेच्या कलाने विकलांग मनाला आनंदाच्या अथांग डोहात चिंब भिजवण्याचा हा अल्पसा यत्न  !!
कला ही एक मनाभावने केलेली साधनाच आहे.

अनेकाची व्यथा, वेदनांच्या कथा ऐकल्यानंतर मलाही जाणवलं की आता खरच वेगळेपणाने लोकांना घडवायला हवं. औषधांचा विट आणि पैशांची किटकिट ह्यापासून दूर राह्ण्याकरिता अनेकांनी कलेची संगत पसंत केली. ताण-तणावाची राखरांगोळी झटकली आणि छान वेलांट्या लेऊन रंगेबिरंगी फुलणारी रांगोळी अनेकांच्या समोर ठेवली. त्यांना करायला प्रेरणा दिली. त्यांनाही मिळालेल्य प्रोत्साहनाने रंगात न्हाऊन निघाले आणि वेदना भुलून गेले.

मनाचे विविध रंग, विविध छंद यांचा विचार करायला हवा. स्वास्थ्याला त्याचा रंग प्राप्त व्हावा याचकरिता प्रयत्न करावासा वाटला आणि स्वास्थ्यरंग ही एक आरोग्य चळवळ सुरु केली. आजच्या रंगहीन स्वास्थ्याकडे पाहता स्वास्थ्यरंग प्रत्येकाच्या मनामध्ये उदयास येण्याची आवश्यकता जाणवते. प्रत्येकाने आपापले छंद ओळखून मन रमवणं उत्तम की मनासारखं काहीच घडत नाही म्हणून रोज मरण अनुभवणं, यापैकी पहिला पर्याय कधीही श्रेष्ठ.

प्रत्येकाने आपले छंद ओळ्खावे, स्वतःमधील षड्रिपूंचा त्याग करावा आणि स्वतःला कलेच्या प्रामाणिक अंगाकडे स्वाधिन करावं. ज्याप्रकारे निःस्वार्थ निसर्ग आपल्याला सढळरित्या सर्व काही देतो त्याप्रकारेच आपण ही निसर्गाला एकदा बहाल करुन पहाव. आपण निःस्वार्थ भावनेने कलेची साधना केल्यास ते कधीच निष्फळ ठरत नाही. तन मनाने कलेकडे एक पाऊल उचललं तर कला ही निश्चितच दोन पावलांनी आपल्यकडे सरकते यात काहीच दुमत नाही.

लेखाचा शेवट करताना एक वैद्य म्हणून सांगू इच्छितो की, नुसतेच सप्तधातू-अग्नि-दोषांची साम्यावस्था टिकवणे म्हणजेच स्वास्थ्य” नव्हे. तर खर्या अर्थाने “प्रसन्नत्मेंद्रियमन” जोपर्यंत विगुणातून गुणात्मक पद्धतीने रंगास येत नाही तोपर्यंत स्वास्थ्यस्थापन करणॆ कठीण बाब आहे. शारिरीक तथा मानसिक स्वस्थ्याकरिता मनाच्या विविध रंगांची, विविध छंदांची जोपासना व साधना केल्यास, स्वास्थ्य हे आपल्यापासून कधीच दुरावणार नाही असा ठाम विश्वास वाटतो.

डाॅ. तेजस लोखंडे,
॥स्वास्थ्यरंग॥™ भ्रमणध्वनी:९७७३२६७००१                     drtejus.lokhande@gmail.com
swasthyarang.blogspot.in

Please share ahead if you like and agree.

                          

          🍃 ॥आरोग्यं भव॥🍃